Maharashtra Live : पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई तक

14 Jun 2024 (अपडेटेड: 14 Jun 2024, 04:57 PM)

Maharashtra news live : विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे... वाचा सगळ्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...

Mumbaitak
follow google news

Maharashtra News Updates : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. सगळीकडे आता राजकीय धुरळा खाली बसू लागला असला, तरी महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्यात विधान परिषद निवडणूक होत असून, त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, सगळेच मतदारसंघांमध्ये चाचपणी करताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव आणताना दिसत असून, लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत राजकीय धुळवड जास्त असणार असेच संकेत मिळू लागले आहेत.  

सर्व घडामोडींची माहिती आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घ्या लाईव्ह अपडेट्समध्ये....

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:49 PM • 14 Jun 2024
    Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

    विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 जूनपासून सुरू होत आहे. ते 12 जुलैला संपेल. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी याची अधिसूचनाही जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूनीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. तसंच राज्य सरकार 28 जून रोजी 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

  • 03:05 PM • 14 Jun 2024
    Maharashtra News : पक्षात कोणी नाराज नाही - अजित पवार

    'छगन भुजबळ, प्रफुल पटेल, तटकरे यांनी सांगितलं आहे की, कोणी नाराज नाही. विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत', पक्षात कोणी नाराज नसल्याचे अजित पवार म्हणाले. फडणवीस नाशिक मध्ये होते, एकनाथ राव यांना मी सांगितलं होतं की आम्ही फॉर्म भरायला जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

     

  • 12:57 PM • 14 Jun 2024
    Maharashtra News : विधानसभेच्या जागांबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच बोलले...

    “विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष हा साहजिकच मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणारच आहेत. इतर ठिकाणी निवडून येण्याचे मेरीट लक्षात घेऊन, चर्चा होऊन जागा मिळतील. निवडणुकीच्या पूर्वी अशा चर्चा होत असतात याचा अर्थ आमच्यामध्ये विसंगत आहे असं काही नाही,” असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
     

  • 12:43 PM • 14 Jun 2024
    Maharashtra News : छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांनी इच्छा व्यक्त केली होती हे खरंय- हसन मुश्रीफ

    "छगन भुजबळ नाराज नाहीत. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती हे खरं आहे. छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे. छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे तुम्ही राज्यसभेत जाण्याचा आग्रह मागे घ्यावा अशी विनंती केली. त्यामुळे त्यांनी अतिशय आनंदाने सुनेत्रा वहिनी यांचं नाव घेतलं आणि काल ते उपस्थित देखील राहिले. स्वतः अमित शाह साहेबांनी नाशिकमधून ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी असं सांगितलं होतं. परंतु नाशिकची जागा शिंदे गटाची विद्यमान खासदारांची जागा होती. त्यांनी ती जागा द्यायला नकार दिल्यामुळे भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही," असं हसन मुश्रीफ म्हणाले.

     

  • 10:55 AM • 14 Jun 2024
    Maharashtra News Update : "दिवसा स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना...", राणांचा चिमटा

    अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. नवनीत राणा यांनी यावेळी ठाकरेंनाही चिमटा काढला. 

    "पुढील चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करताना दिसतील", असे विधान संजय राऊत यांनी केले. या विधानावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "ते (संजय राऊत) स्पष्ट शब्दात म्हणाले होते की, आम्ही शपथ घेऊ आणि नरेंद्र मोदी यांना त्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देऊ. त्यावर मी इतकंच म्हणेन की, दिवसा स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना माहिती नाही की, आम्ही महाराष्ट्रात किती काम केले आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता आम्हालाच प्रतिसाद देईल."

  • 09:34 AM • 14 Jun 2024
    Chhagan Bhujbal : लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच का अन्याय? भुजबळांनी दिलं उत्तर

    पक्षाकडून डावललं जातंय का? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, "ठीक आहे आता. पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. थांबावं लागतं काही वेळा आपल्याला. मला राजकारणात ५७ वर्षे झाली. अनेक वेळा असं झालं. आपल्याला वाटतं की, असं व्हायला पाहिजे, पण नाही होतं. तो दैवाचा भाग असेल किंवा पक्षाच्या मर्यादा असतील."

    लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच का अन्याय? "हे आता त्यांना विचारा, ज्यांना विचारायचं आहे. मला काय माहिती की काय झालं?" 

  • 09:25 AM • 14 Jun 2024
    Chhagan Bhujbal : "...म्हणून मी नाशिक लोकसभा लढवायला तयार झालो होतो"

    पुण्यात माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले, "मला इच्छा आहे खासदार होण्याची म्हणून तर मी नाशिकची लोकसभा लढवायला तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट फायनल केलं असं मला सांगितलं. मी कामाला लागलो. त्यानंतर एक महिना नाव जाहीर होईना म्हणून म्हटलं हा अपमान खूप होतोय. मी थांबून घेतलं. कारण समोरचा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागला होता. माघार घेतल्यानंतर सुद्धा १२-१५ दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. अर्ज भरायच्या एक दिवस आधी. या सगळ्याचे परिणाम शेवटी जय-पराजय यावर होत असतात."

  • 09:04 AM • 14 Jun 2024
    Raj Thackeray Update : महायुतीचा कटू अनुभव, राज ठाकरे एकटे लढणार!

    लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेची भूमिका काय असेल, याची सगळ्यांना उत्सुकता होती. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला. राज ठाकरेंच्या मनसेने १ जागा मागितली होती. पण, जागावाटपाचा घोळ आणि धनुष्यबाण चिन्हा लढण्याची अट, या गोष्टीमुळे राज ठाकरे दुखावले गेले. जाहीर सभेत त्यांनी हे बोलून दाखवले. इंजिन हे निवडणूक चिन्ह कष्टाने कमावले आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे सुनावले.

    आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राज ठाकरे लागले असून, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 

    'महायुतीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही', असे बोलून दाखवत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना 'आपण विधानसभेला 200 ते 250 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत', असा स्पष्ट मेसेज दिला आहे. 

    राज ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा वाईट अनुभव आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

follow whatsapp