Maharashtra News Live Updates : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत. त्याचे प्रतिबिंब राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पातही दिसून आले आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात भरघोस घोषणा केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मतांची पेरणी केल्याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. आता अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्याचे कामकाज तुम्ही लाईव्ह बघू शकता.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय घटनांसह इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 01:10 PM • 29 Jun 2024Maharashtra News : मुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठ्या योजनेची घोषणा
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यातील जनतेला विविध तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवण्यासाठी सरकारने योजना आणण्याची मागणी केली. आमदार प्रकाश सुर्वे, आमदार राम कदम यांनीही अशीच मागणी केली.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सरकार लागू करेल, अशी घोषणा विधानसभेत केली.
काय होती लक्षवेधी?
"महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन जाणे, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाणे, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असणे, तसेच आपल्या हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ व अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्व असणे, त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असणे, गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे संघ "समूह तीर्थयात्रा" काढण्याचाही विचार करत असणे, परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नसणे, त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु करण्याची आवश्यकता, सदर योजनेत हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांच्या महत्वाच्या 3 तीर्थस्थळांचा समावेश करणे, राज्य सरकारतर्फे धार्मिक न्यास-धर्मस्व विभाग स्थापन करून त्यातून या यात्रांचे आयोजन करण्याबाबतची निर्णयात्मक कार्यवाही करुन तातडीने अंबलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शासनाने कार्यवाही करण्याची आवश्यकता व उपाययोजना."
- 12:20 PM • 29 Jun 2024विधानसभेत विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी, पहा Live
पावसाळी अधिवेशन सुरू असून, विधानसभेत काही मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्या खडाजंगी सुरू झाली. पहा लाईव्ह
- 11:43 AM • 29 Jun 2024Maharashtra News : विधान परिषदेसाठी 10 भाजप उमेदवारांची यादी व्हायरल, बावनकुळे म्हणाले...
राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार, याची चर्चा सुरू असताना एक पत्र व्हायरल झाले. या पत्राबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
'भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत 20 पेक्षा अधिक नावांची चर्चा झाली. कुणीतरी खोडसाळपणा केला. ते पत्र नाहीच. ते फक्त एक पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा मारला असून, त्याला काही अर्थ नाही. केंद्रीय संसदीय मंडळ चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील", असे बावनकुळे म्हणाले.
- 10:16 AM • 29 Jun 2024Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 6 प्रवाशी जागीच ठार
बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागी मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
28 जून रोजी रात्री 11 वाजता स्विफ्ट डिझायर आणि इर्टिगा कार यांची समोरासमोर धडक झाली. यातील एक कार राँग साईटने आल्याने ही घटना घडली. इर्टिगा कारमधील फैजल शकील मन्सुरी, फय्याज मन्सुरी, अल्थ मेस मन्सुरी (सर्व रा. मालाड पूर्व, मुंबई) आणि स्विफ्ट कारमधील लक्ष्मण मिसाळ, संदीप बुधवंत, विलास कायदे यांचा जागी मृत्यू झाला.
- 09:45 AM • 29 Jun 2024Maharashtra Marathi News : अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर शरद पवार म्हणाले...
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "अर्थसंकल्प पाहता असे दिसतेय की, ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाही. येण्याची तरतूद नाही, अशा गोष्टी त्यात सांगण्यात आल्या आहेत. पूर्ण अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून मांडला आहे."
"सर्व तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. तरतूद कमी रकमेची करायची आणि प्रत्यक्षात सूचवायचं अधिक रक्कम दिली जाईल. जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या ती गोष्टींचे आकडे पाहिले तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे", असे शरद पवार म्हणाले.
"हा अर्थसंकल्प काहीतरी भयंकर करतोय असे दाखवणारा आहे. पण, माझी खात्री आहे की, लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कितपत होईल, याची मला शंका आहे", असे शरद पवार अर्थसंकल्पातील घोषणांबद्दल बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
![follow whatsapp](/assets/icons/followWhatsApp.png)