Ketaki Chitale: 'डोक्यात हवा गेलीय.. मी तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो...', चितळे शिंदेंवर संतापली; फडणवीस-पवारांनाही बरंच बोलली!

मुंबई तक

13 Jun 2024 (अपडेटेड: 13 Jun 2024, 06:02 PM)

Ketki Chitale Angry on BJP Mahayuti: अभिनेत्री केतकी चितळेने एक व्हिडीओ जारी करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. वक्फ बोर्डाला 10 कोटींची आर्थिक मदत दिल्यानंतर चितळेने त्यावर संताप व्यक्त केला.

follow google news

Ketaki Chitale CM Eknath Shinde: मुंबई: मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आली आहे. एवढंच नव्हे तर तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा केतकीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तसंच तुम्हाला हिंदू नकोएत का? असा सवाल केतकीने विचारला. एवढ्यावरच न थांबता तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर सडकून टीका केली. (marathi actress ketaki chitale angry on cm shinde dcm devendra fadnavis ajit pawar and bjp mahayuti maharashtra government on waqf board aid)

राज्यातील महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणत केतकीने सोशल मीडियावर अत्यंत तावातावाने सरकारवर टीकेची झोड उठवली. 'अरे निर्लज्ज माणसांनो, तुम्ही बधीर झाला आहात का?' अशा शब्दांचा वापर करत केतकीने राज्यातील सरकारवर टीका केली आहे. 

हे ही वाचा>> 'शाहांना सांगितलेलं शिवसेना पक्ष चिन्ह काढू नका...', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

यावेळी केतकी चितळे हिने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. या तीनही नेत्यांवर केतकीने बराच संताप व्यक्त केला.

पाहा केतकी चितळे नेमकं काय म्हणाली...

बातमीच अशी धक्कादायक वाचून उठलीय की, काय बोलावं काही कळत नाही यावर.. म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही.. त्यांचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय. तुम्ही बधिर आहात की, तुम्ही आम्हाला बधिर करून सोडणार आहात? 

मी नेहमी म्हणत होते की, लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचंय हे ठरलेलं आहे. त्यात काही प्रश्नच नव्हता. कारण मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी पूर्वीपासून बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत ठाम करूनच सोडलेलं आहे.

हे ही वाचा>> Raj Thackeray : राज ठाकरेंनी वाढवली भाजपची 'कटकट'! स्वबळावर लढणार 'एवढ्या' जागा

राष्ट्रात जिथे-तिथे मोर्चे निघतायेत.. की वक्फ बोर्ड रद्द करा.. आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये देताय. आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. ठरवलंयत काय.. तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोयत का? हे ही ठरवलंय का तुम्ही? 

म्हणणं काय तुमचं.. एक परत स्वत:च्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका.. काका माझं चुकलं मला माफ करा मला परत घ्या. दुसरी व्यक्ती काय करतेय.. तीन चाकी सायकल चालवता येत नाहीए.. डोक्यात हवा गेलेली आहे.. म्हणून मी माझी तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो. असं म्हणणारए... 

तिसऱ्याचं तर काय.. राजीनामा स्वीकारतच नाहीए.. माझा राजीनामा घ्या.. माझा राजीनामा घ्या.. हे मान्य केलं जात नाहीए.. म्हणून या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा.. तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का? तुमचं म्हणणं काय आहे? की, बघा दहावीतील मुलगा म्हणतो की, बघा मी आता फेलच होऊन दाखवेन.. तसं तुम्ही तुमची किती संख्येने मतं कमी करणार आहात हे ठरवलंय का?

हेच तुमचं लक्ष्य आहे का विधानसभेसाठी? म्हणणं काय आहे तुमचं नेमकं..? स्पष्ट.. स्पष्ट क्लिअरकट सांगून टाका..

वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी आम्ही पैसा देतोय.. म्हणजे काय आहे हे.. वक्फ हे हिंदूंची एवढी जमीन खाऊन बसलंय.. बरं वक्फ बोर्ड तुमच्या घरी आला, म्हणाला की.. ही जमीन आमची आहे, तुमची नाहीए.. तर आपण बोंबा मारत रस्त्यावर फिरू. 

कारण वक्फ बोर्डचा निर्णय हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये चालत नाही. धन्य हो.. त्या बॅकसीट ड्रायव्हर मातेचं.. सोनियाजी गांधींचं.. ज्यांनी वक्फ बोर्डला हा अधिकार दिलाय की, जे काही घडेल वक्फ बोर्डची जी की समिती आहे तिकडेच सुनावणी होईल आणि निर्णय दिला जाईल. यामुळेच हिंदूंची किती तरी कोटी एकर जागा हडपल्या आहेत यांनी. 

सर्वाधिक मालकीची जागा ही भारत सरकारची आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर वक्फ बोर्ड आहे. यांना रद्द केलंच पाहिजे. पण तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय.. अरे निर्लज्ज माणसांनो.. थोडा, थोडा तरी.. संघाला तोडलं, सनातनींना तोडतायेत.. नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की, नोटा एवढा भिकारीपणा या जगात नसेल. पण थँक्यू तीन तिघाडी सरकार.. तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटण दाबेन.. 

असंच जर चालत राहिलं नाही तर बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला फार वेळ लागणार नाहीए.. तिकडे दीदी बोलावतेच आहे बांग्लादेशींना इकडे तुम्ही रोहिंग्यांना जागा द्याल.. 

आधीच मानखुर्द हे मुसलमानांनी भरलं आहेच. तुम्ही रोहिंग्यांनाही आणून आमच्या डोक्यावर बसवा. मुसलमान राष्ट्र एकदाचं जाहीर करूनच टाका ना.. एकदाचं.. कशाला तुम्ही महाराष्ट्र.. महाराष्ट्र.. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र.. कशाला बोंबा मारताये.. खरं ते बोलून टाका ना.. औरंगजेबाचा महाराष्ट्र हेच करायचंय ना तुम्हाला.. करून टाका.. कशाला थांबलायेत, कोणाची वाट बघताय.. 

तुम्हाला छ. संभाजीनगर नकोय ना.. तुम्हाला औरंगाबादच हवंय ना.. महाराष्ट्राचं नावच बदलून टाका ना.. इतकी सोप्पी गोष्ट आहे.. 

अरे उगाच छत्रपतींचं, फुलेंचं, आंबेडकरांचं, सावरकरांचं कोणाचंही नाव घेऊ नका.. त्यांचा अपमान करू नका. त्यांचा महाराष्ट्र म्हणून.. 

कारण तुम्ही जे काही कृत्य करताय ना.. ते या लोकांनी केलेलं नाहीए. त्यांची नावं तोंडातूनही काढू नका यापुढे.. 


 

 

 

    follow whatsapp