लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अखेर अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

bhavesh bhinde, mumbai hoarding accident
भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे.

पंतप्रधान मोदींनी १५ मे रोजी नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचारसभा घेतली. तर मुंबईत रोड शो केला. 

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत असून, आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान होत असून, यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह इतर ७ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. 

पाचव्या टप्प्यात भाजपकडून ध्रुवीकरणाचा प्रयत्न होताना दिसत आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा आणि संपत्ती देण्याचा मुद्दा भाजपकडून प्रामुख्याने मांडला जात आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून संविधान बचावचा आणि जाचक कायदे संपवण्याचा त्याचबरोबर कल्याणकारी योजना सुरू करण्याचा प्रचार केला जात असल्याचे दिसत आहे. 

महाराष्ट्र आणि देशातील लोकसभा निवडणूक आणि राज्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:28 PM • 16 May 2024

    घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अखेर अटक

    घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी इगो मिडीयाचा मालक भावेश भिंडे फरार होता. अखेर आज त्याला मुंबई गुन्हे शाखेने उदयपूरमधून अटक केली आहे. 

  • 05:58 PM • 16 May 2024

    Maharashtra Lok Sabha : "शरद पवार होश मे आओ", संसदेत का दिल्या गेल्या होत्या घोषणा?

    नाशिक येथील सटाणामध्ये शरद पवार यांची प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी कांद्याच्या किंमतीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. यावेळी शरद पवारांनी जुना किस्साही सांगितला. 

    ते म्हणाले, "दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं की, ज्या वेळेला आमचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या किंमती  वाढल्या. तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, ते भाजपावाले पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले आणि माझ्याविरुद्ध घोषणा द्यायला लागले."

    "काय म्हणणं होतं त्यांचं? शरद पवार होश मे आओ, प्याज की  किंमत कहा गयी? खाना मुश्किल हो गया है..! जसं यांचं दोन वेळचं जेवण फक्त  कांद्यावरच होतं. मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर?"

    "मी  त्यांना सांगितलं की, कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायत शेतकरी आहे, हा लहान  शेतकरी आहे. कधीतरी दोन पैसे मिळतात एखाद्या वर्षी दोन पैसे त्यांना मिळाले  तर लगेच कांद्याच्या माळा घालून घोषणा द्यायचे कारण नाही आणि तुम्ही  कांद्याच्या माळा घातल्या किंवा कवडाच्या माळा घातल्या मी कांद्याची किंमत  कमी होऊ देणार नाही, कांद्याची किंमत वाढेल कशी, हे मी बघीन", अशी आठवण शरद पवारांनी उपस्थितांना सांगितली. 
     

  • 03:18 PM • 16 May 2024

    राहुल गांधींना राम मंदिराला कुलूप लावायचेय -मोदी

    लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे.

    उत्तर प्रदेशातील भदोही येथे पंतप्रधान मोदींची प्रचारसभा झाली. या सभेत मोदींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना लक्ष्य केले. 

    "रामलल्ला जेव्हा टेंटमध्ये राहायचे, तेव्हा सगळ्यांना वेदना व्हायची. रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत, पण हे लोक अजूनपर्यंत ते स्वीकारू शकलेले नाहीत. समाजावादी पक्षाचे नेते म्हणताहेत की, राम मंदिर बेकार आहे. काँग्रेसचे शहजादे न्यायालयाचा निकाल बदलून राम मंदिराला  कुलूप लावू इच्छितात आणि रामलल्ला पुन्हा टेंटमध्ये जाण्यासाठी भाग पाडणार आहेत. त्यांना उत्तर मिळणार आहे की नाही?", असे मोदी म्हणाले.

     

  • 03:10 PM • 16 May 2024

    Maharashtra Live : परत येणाऱ्यांचा विचार करू; जयंत पाटलांचं येवल्यात विधान

    येवला येथे माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परत येऊ इच्छिणाऱ्यांचा विचार केला जाईल, असे म्हटले आहे. 

    "पक्षात अनेक तरुण चांगले काम करत असून, नव्या चेहऱ्यांना पवारसाहेब संधी देतील. परंतू जिथे अजिबात पर्याय नाही, तेथे पक्षात परत येणाऱ्यांना घेण्याचा विचार करू", असे जयंत पाटील म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 01:39 PM • 16 May 2024

    Maharashtra Lok Sabha election : मुंबईबद्दलचा राग प्रत्येक कृतीतून दिसतोय -जितेंद्र आव्हाड

    मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, १५ मे रोजी पंतप्रधान मोदी यांचा रोड शो पार पडला. यावरून जितेंद्र आव्हाडांनी मोदींवर टीका केली आहे. 

    "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौर्‍यावर होते. त्यांनी आज ईशान्य मुंबईमध्ये मोठा रोड शो केला. पण, भाजपचे नेते त्यांना हे सांगायला विसरले की, ते ज्या रस्त्यावर रोड शो करत होते. त्याच्याच समांतर रस्त्यावर होर्डिंग कोसळून १५ पेक्षा अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही भयंकर दुर्घटना होती. मुंबईच्या व्यस्त कार्यक्रमात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांना श्रद्धांजली अर्पण करायलाही त्यांना वेळ मिळाला नाही. मुंबईबद्दलचा राग हा प्रत्येक कृतीतून दिसतोय; तो कशासाठी, हा मात्र प्रश्न आहे."

     

  • 01:29 PM • 16 May 2024

    Lok Sabha election Maharashtra : मविआचं सरकार आलं, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? चव्हाणांनी दिलं उत्तर

    राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आले, तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. 

    चव्हाण म्हणाले, "मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले, तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत लढत होते, तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील; त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता.ठ

    "आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणार नाही. ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल", असं उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत दिले. 

  • ADVERTISEMENT

  • 12:31 PM • 16 May 2024

    Maharashtra lok Sabha Election : शरद पवारांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

    नाशिकमध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 'शरद पवारांनी आधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला', असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर पवारांनी चिमटा काढला. 

    "राज ठाकरे काय म्हणाले ते मला माहिती नाही. राज ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके स्थान काय आहे, हे देखील मला माहिती नाही. मी असे ऐकले होते की त्यांचा नाशिकमध्ये स्ट्राँग बेस आहे (नाशिकमध्ये पक्ष मजबूत आहे). मात्र, मला हल्ली नाशिकमध्ये ना ते दिसतात, ना त्यांचा पक्ष", असे म्हणत पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
     

  • 10:42 AM • 16 May 2024

    Maharashtra Lok Sabha election 2024 : 'माझी चूक झाली', मोदींचं नाव घेत उद्धव ठाकरे काय बोलले?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १५ मे रोजी दुपारी सभा झाली. त्यानंतर सायंकाळी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली. 

    या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकेचे बाण डागले. "भाजपा पक्ष ५ जून रोजी फूटणार असून नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहणार नाहीत", असे ठाकरे म्हणाले. 

    "२०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मोदींना मते द्या असे सांगायला आलो होतो; ही माझी चूक झाली. त्यासाठी मी महाराष्ट्राची माफी मागतो", असे विधान ठाकरेंनी या सभेत केले. 

  • 09:41 AM • 16 May 2024

    Maharashtra lok Sabha election : राज ठाकरेंच्या 'त्या' प्रश्नाला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

    राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना सातत्याने सहा नगरसेवकांबद्दल प्रश्न विचारला जातो. माझ्या पक्षाचे सहा नगरसेवक फोडून फोडाफोडीच्या राजकारणाला उद्धव ठाकरे यांनीच सुरूवात होती, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. 

    त्या आरोपाला आदित्य ठाकरेंनी यांनी उत्तर दिले. ते एका मुलाखतीत बोलत होते. "त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून २० वर्षे झाली. पण, अशी एक घटना सांगा की आम्ही त्यांच्यावर टीका केली.ठ 

    "काही नात्यांवर आपण बोलायचे नसते, असे घरातून सांगितले आहे. आमच्याकडे मनसेचे जे नगरसेवक आले, ते नंतर निवडून आले. त्यातील काही निवडून आले. त्यातील काही आमदारही झाले होते", असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.

  • 09:15 AM • 16 May 2024

    Maharashtra Lok Sabha election : अजित पवार गेले कुठे?

    महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारात दिसेनासे झाले आहेत. चौथ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या होत्या.

    चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यापासून अजित पवार अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

    महाराष्ट्रात अजून १३ लोकसभा मतदारसंघातील मतदान बाकी आहे. या मतदारसंघात महायुतीच्या उमदेवारांचा प्रचार सुरू आहे, पण त्यात अजित पवार दिसत नाहीयेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतं आहे. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक आणि कल्याणमध्ये प्रचारसभा घेतल्या, तर मुंबईत रोड शो केला. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांनाही अजित पवार गैरहजर होते. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी महाराष्ट्रातील मित्रपक्षाचे नेते म्हणून मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल हजर होते. 

    मुंबई काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण, अजित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चाच सर्वाधिक होताना दिसत आहे. महायुतीच्या १३ उमेदवारांचा प्रचार सुरू असताना अजित पवार नेमके कुठे गेले? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT