मतदानात चूक केली तर कडक कारवाई होणार, शिवसेना आता ताकही फुंकून पिणार

मुंबई तक

• 10:19 AM • 18 Jun 2022

मुंबई: विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव केली जात आहेत. सर्वच पक्ष आता हाय अलर्टवरती आले आहेत. शिवसेना आमदार सुहास कांदेंच मत राज्यसभा निवडणुकीत बाद झाल्यानंतर शिवसेना जास्त खबरदारी घेत आहे. दोन दिवसीय कार्यशाळा घेऊनही सेनेचे एक मत बाद झाले होते त्यामुळे शिवसेनेने […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव केली जात आहेत. सर्वच पक्ष आता हाय अलर्टवरती आले आहेत. शिवसेना आमदार सुहास कांदेंच मत राज्यसभा निवडणुकीत बाद झाल्यानंतर शिवसेना जास्त खबरदारी घेत आहे. दोन दिवसीय कार्यशाळा घेऊनही सेनेचे एक मत बाद झाले होते त्यामुळे शिवसेनेने आता आमदारांना सक्त आदेश दिले आहेत. जर मत बाद झाले किंवा काही दगाफटका झाला तर पक्ष कडक कारवाई करणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

राज्यसभेला शिवसेनेचे पारडं जड वाटत असतानाही संजय पवारांचा पराभव झाला होता. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) झालेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून पक्षाकडून खास काळजी घेतली जात आहे. कांदेंचे मत बाद झाल्याने आणि अपक्ष आमदारांनी दगाफटका केल्याने पक्षनेतृत्त्वाकडून नाराजी व्य्क्त करण्यात आली होती. पुन्हा तेच होऊ नये म्हणून पक्षनेतृत्व सावध झाले आहे. मतदान करताना कोणी दगाफटका केला तर शिवसेनेने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

आदित्य ठाकरेंवरती खास जबाबदारी

दरम्यान शिनसेनेचे सर्व आमदार पवईतील रेनेसां हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. कालपासून राज्यभरातील सर्वच आमदार त्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. विधान परिषदेची मतदान पद्धत, आमदारांवरती दबाव आणून ते फुटू नयेत म्हणून सर्व ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. काल बैठकीला स्वत: मुख्यमंत्री उपस्थीत राहणार होते, परंतु ते राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले. म्हणून कालच्या बैठकीचे सारथ्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्या बैठकीत आमदारांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना आमदरांशी संवाद साधण्याची जबाबदारी मंत्री आदित्य ठाकरेंवरती आहे. आदित्य ठाकरे हे गटागटाने आमदारांच्या बैठका घेत आहेत, त्यांना सुचना करत आहेत.

शिवसेना घेतेय खास खबरदारी

राज्यसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतं जास्त असतानाही दुसऱ्या फेरीत आकड्यांची व्यवस्थीत गोळाबेरीज करुन भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता. राज्यसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दगाबाजी झाल्याचा आरोप करत संजय राऊतांनी थेट आमदारांची नावे घेतली होती. आता असाच दगाफटका विधान परिषद निवडणुकीत होऊ नये म्हणून शिवसेना सतर्क आहे. या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत. आणि या दोन्हीही उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी सेनेकडे पुरेसे संख्याबळ आहे. परंतु खबरदारी म्हणून शिवसेना आपल्या आमदारांची विशेष काळजी घेत आहे.

    follow whatsapp