'WhatsApp वर इतिहास वाचू नका..' राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून थेट...

मुंबई तक

Raj Thackeray aurangzeb tomb: वर इतिहास वाचू नका..' असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर टिप्पणी केली आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून कोणावर केली टीका
राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून कोणावर केली टीका
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (30 मार्च) गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित जाहीर सभेत एका विधानाने अनेकांचे कान टोचले आहेत. “व्हॉट्सअॅपवर इतिहास नाही वाचता येत..,” असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या इतिहासाबाबतच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी या विधानावरून अनेकांवर निशाणा साधला आहे.

'WhatsApp वर इतिहास नाही वाचता येत.. इतिहास वाचायचा असेल तर', पाहा राज ठाकरे काय म्हणाले

'आपल्याला पडलीए औरंगजेबाची. तो बसलाय एकटाच द्राक्ष खात.. आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की उडवली पाहिजे. आता कुठून आठवलं?'

'चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधून उतरला की, हे उतरले. छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर, अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळाला? WhatsApp वर इतिहास नाही वाचता येत.. इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला पुस्तकात डोकं घालावं लागेल.' 

हे ही वाचा>> MNS: 'कुंभमेळ्याला गेलेले लाखो लोक...', राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका

'कोणीही बडबडायला लागलंय आता इतिहासावर.. विधानसभेत देखील बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही.. औरंगजेबावर बोलतायेत. माहितीए का तरी औरंगजेब काय प्रकरण होतं. बाहेरून आलेले सगळे लोकं.. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला.' असं म्हणत राज ठाकरेंनी औरंगजेबाची कबर आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावरून जोरदार टीका केली. 

'300-400 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय'

पुढे राज ठाकरे असंही म्हणाले की, 'आणि मग काय सोप्पंय इतिहासमधून जातीपातीमधून तुम्हाला भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली. तिकडे मराठे नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनीच केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही. त्यांना फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचीए तेवेढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य.. तुमची माथी फक्त भडकवायची.' 

'अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची, कल्पनांची आणि भावनांची भांडी ठणाठण फुटतील. हिंद प्रांतात एक अत्यंत कडवट आणि प्रभावी असं स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब.' 

'हे त्यांचं स्वप्न... त्यांचे वडील असल्यापासून हे स्वप्न पाहत होत्या. आमचीच लोकं या लोकांकडे का चाकरी करतायेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे.' 

'जे कोणी महाराष्ट्रातील सरंजामदार होते त्यांच्या विरोधातीलच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते? त्यांना जातीतून कोण पाहतंय. अफजलखानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजलाखानाशी बोलणी करायला गेलेला शिवाजी महाराजांचा वकील हा ब्राह्मणच होता. त्यावेळेस ही सगळी माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती.' 

'इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर लिहिलेली नाहीए. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील हे आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय जातीत.' असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सजग राहण्याचा सल्ला दिला. इतिहासाच्या चुकीच्या आकलनामुळे समाजात गैरसमज पसरत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. इतिहास हा आपली ओळख आहे, पण तो नीट समजून घेतला पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

हे ही वाचा>> Waghya Dog controversy: 'संभाजीराजे 100 टक्के चूक बोलले', संभाजी भिडे असं का म्हणाले.. काय आहे नेमका वाद?

आगामी काळात राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरू शकतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपली परखड मतं व्यक्त केली आहेत. दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले असून, हे विधान चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp