कोण होती दिशा सालियन... का सुरू आहेत आदित्य ठाकरेंवर आरोप?

मुंबई तक

दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा नेमकी कोण होती आणि तिचा नेमका इतिहास काय होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Disha Salian: मुंबई: दिशा सालियन हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक (मॅनेजर) असलेली दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. या घटनेनंतर तब्बल पाच वर्षांनी या प्रकरणाने नवे वळण घेतले असून, तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला असून, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर आरोप करण्यात आले आहेत. जाणून घ्या दिशा सालियन कोण होती आणि या प्रकरणात आतापर्यंत काय घडले.

कोण होती दिशा सालियन?

दिशा सालियन ही कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेली एक सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर होती. ती मुंबईत राहून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होती आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम करायची. ती अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती. 

हे ही वाचा>> Disha Salian च्या मृत्यूचं रहस्य 5 वर्षांनंतरही कायम, आदित्य ठाकरेंवर 'ते' आरोप अन्...

परंतु त्याच्या मृत्यूपूर्वी ती त्याच्यासाठी काम करत नव्हती, असे काही अहवाल सांगतात. दिशा ही एक व्यावसायिक आणि मेहनती तरुणी म्हणून ओळखली जात होती. तिचे शिक्षण मुंबईत झाले होते आणि तिने मनोरंजन उद्योगात आपली कारकीर्द घडवली होती.

मृत्यूची घटना

8 जून 2020 च्या मध्यरात्री दिशा सालियनचा मुंबईतील मालाड परिसरातील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी ही घटना आत्महत्या असल्याची नोंद केली होती. पोलिसांच्या मते, दिशा त्या रात्री तिच्या मित्रांसोबत पार्टी करत होती आणि नशेत असताना तिचा तोल गेला, ज्यामुळे ती खाली पडली. 11 जून 2020 रोजी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा काहींनी केला.

या घटनेच्या अवघ्या सहा दिवसांनंतर, 14 जून 2020 रोजी, सुशांत सिंग राजपूत यानेही आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. या दोन घटनांमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आणि दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशी जोडण्यात आले.

प्रकरणाला राजकीय वळण

दिशाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले. भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आणि यात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला.

हे ही वाचा>> 'दिशावर गँगरेप अन्...' आदित्य ठाकरेंसह 5 जणांची नावं, खळबळ उडवून देणारी दिशाच्या वडिलांची याचिका जशीच्या तशी

दिशाच्या कुटुंबाने सुरुवातीला या आरोपांचे खंडन केले होते आणि आपली कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

वडिलांची याचिका आणि गंभीर आरोप

सतीश सालियन यांनी 19 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह 14व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आला. 

याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सतीश सालियन यांनी असा दावा केला आहे की, मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव टाकून खोटे पुरावे स्वीकारण्यास भाग पाडले आणि सत्य दडपण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवावा आणि समीर वानखेडे यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच, 8 आणि 9 जून 2020 चे सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ न्यायालयात सादर करावा, असेही याचिकेत नमूद आहे.

आतापर्यंत काय घडले?

2020: दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी आत्महत्या असल्याचे निष्कर्ष काढले. सीबीआयने सुशांत प्रकरणाचा तपास केला, परंतु दिशाच्या मृत्यूचा स्वतंत्र तपास केला नाही.

2022-2023: भाजप आणि शिंदे गटाने हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करून विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशीची मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीचे आदेश दिले होते.
 
2025: दिशाच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल करून प्रकरण पुन्हा चर्चेत आणले. याचिकेनंतर सालियन कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

सध्याची स्थिती

शिवसेना आमदारांनी विधान भवन परिसरात मूक आंदोलन करून या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि शिवसेना (UBT) यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार की नाही याकडेच सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या प्रकरणाला आता राजकीय आणि कायदेशीर दोन्ही बाजूंनी गती मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp