पहलगाम: पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याचवेळी तेथील छोट्या हॉटेलांमध्ये असणारे 20 ते 25 गॅस सिलेंडर हे मागच्या झाडीत फेकून दिल्याचं समोर आलं आहे. आता हे सिलेंडर नेमके कोणी आणि का फेकून दिले असा सवाल विचारला जात आहे. त्याचविषयी आम्ही आपल्याला नेमकी माहिती देत आहोत.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तेथील छोट्या-छोट्या हॉटेलमध्ये बराच गोंधळ उडाला. बैसरन व्हॅलीच्या विस्तीर्ण मैदानाला लागूनच स्थानिकांनी काही हॉटेल सुरू केले आहेत. याच हॉटेलमध्ये पर्यटकांना चहा, नाश्ता आणि इतर काही खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात. हा संपूर्ण भाग अत्यंत दुर्गम आहे. कारण इथे जाण्यासाठी अद्यापही कोणते रस्ते किंवा दळणवळणाची महत्त्वाची साधनं उपलब्ध नाहीत. बैसरन व्हॅली हा संपूर्ण भाग खूपच सुंदर आणि विविधतेने नटलेला आहे. पण पहलगाम शहरातून तिथे जाण्यासाठी चालत किंवा घोड्यावरूनच जाता येतं.
हे ही वाचा>> Pahalgam Attack: जखमींना पाठीवर घेऊन धावत सुटला..., प्रचंड चर्चेत असलेला सजाद भट्ट आहे तरी कोण?
मात्र, असं असलं तरी बैसरन व्हॅली हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जात असल्याने ते पाहण्यासाठी इथे नेहमी हजारो पर्यटक येतात. त्यामुळेच इथे असणाऱ्या छोट्या-छोट्या हॉटेलांमध्येही बरीच गर्दी असते. जिथे पर्यटक हे चहा, कॉफी, भेळ, मॅगी यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेतात.
हॉटेलांमधील गॅस सिलेंडर का फेकून देण्यात आले?
दरम्यान, 22 एप्रिल 2025 रोजी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा येथील हॉटेलांमध्ये बरेच पर्यटक होते. गोळीबाराचा आवाज ऐकून या पर्यटकांमध्ये एकच घबराट पसरली. तर दुसरीकडे हॉटेल मालक देखील भयभीत झाले. दहशतवादी हे ज्या पद्धतीने गोळीबार करत होते. ते पाहून स्थानिक नागरीक आणि हॉटेल मालक देखील जागीच थिजून गेले होते.
पण जेव्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला तेव्हा येथे असणाऱ्या सर्व हॉटेल चालकांनी आणि त्यांच्या कामगारांनी आपल्या हॉटेलमधील सगळे सिलेंडर तात्काळ हॉटेलमागे असलेल्या झुडपात फेकून दिले. यापैकी अनेक सिलेंडर हे गॅसने भरलेले आणि सिलबंद होते. जवळजवळ 20 ते 25 सिलेंडर हे फेकून दिलेले आढळून आले आहेत.
हे ही वाचा>> पाकिस्तान भारताला ज्याची धमकी देतोय, तो शिमला करार नेमका काय?
याबाबत असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार सुरू केला तेव्हा या लोकांनी हा विचार करुन आपले सिलेंडर खाली फेकले की, एखादी गोळी लागून येथे सिलेंडरचा स्फोट होऊ नये.
जर एखादी गोळी सिलेंडरला लागली असती तर येथे सिलेंडरचा स्फोट झाला असता आणि प्रचंड मोठा भडका उडून आणखी मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे हॉटेल चालकांनी वेळीच प्रसंगावधान राखून आपल्या हॉटेलमधील सगळे सिलेंडर हे हॉटेलच्या मागच्या दिशेला फेकून दिले.
बैसरन व्हॅली परिसरात आता नेमकी काय परिस्थिती?
दरम्यान, आता हल्ल्याला चार दिवस उलटून गेले आहेत. तरीही हे सगळे सिलेंडर त्या परिसरातच पडून आहेत. तसेच येथील हॉटेलं सताड उघडी असून त्यामधील सगळ्या वस्तू देखील इतरत्र पसरलेल्या आहेत.
हल्ल्यानंतर काही वेळाने जेव्हा इथे लष्कराचे जवान आले तेव्हा त्यांनी तिथून सगळ्यांना बाहेर काढून हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. आता तिथे लष्कराचा पहारा असून कोणालाही आत जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
बैसरन व्हॅलीमध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती?
दुसरीकडे बैसरन व्हॅलीसारख्या अत्यंत दुर्गम आणि जंगल असलेल्या परिसरात लष्कर का तैनात नव्हतं असा सवाल सरकारला विचारण्यात आला आहे. ज्यावर सरकारने असं उत्तर दिलं आहे की, अमरनाथ यात्रेवेळी इथे लष्कर तैनात असतं. मात्र, आता येथील स्थानिक आयोजकांनी लष्कराला कोणतीही माहिती न देता हा परिसर पर्यटकांसाठी खुला केला होता. त्यामुळे याबाबत लष्कराला कोणतीही माहिती नव्हती आणि म्हणून येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. असं उत्तर सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
