'निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये म्हणून विखेंनी...'; शरद पवारांचा खळबळजनक दावा!

रोहिणी ठोंबरे

20 Apr 2024 (अपडेटेड: 20 Apr 2024, 01:22 PM)

Sharad Pawar On Radhakrishna Vikhe-patil : अहमदनगरमधील जाहीर सभेत बोलताना, 'निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून सध्याच्या महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे मुंबईतील उद्योगपतीला पाठवून लंके सोडून दुसरा उमेदवार द्या, अशी विनंती केली होती.' असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Mumbaitak
follow google news

Sharad Pawar On Radhakrushna Vikhe-patil : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात जागावाटपाचा तिढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशास्थितीत शुक्रवारी 19 एप्रिल रोजी शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हे वाचलं का?

अहमदनगरमधील जाहीर सभेत बोलताना, 'निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून सध्याच्या महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे मुंबईतील उद्योगपतीला पाठवून लंके सोडून दुसरा उमेदवार द्या, अशी विनंती केली होती.' असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

शरद पवारांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?

'मी जाहीरपणाने आणि जबाबदारीने सांगतो की, विखे-पाटील यांनी तीन आठवड्यांपूर्वी मुंबईतील एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले होते. त्या उद्योगपतीला मी विचारले की, कसं येणं केलं? त्यावर त्या उद्योगपतीने सांगितले की, विखे-पाटील आणि आमचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी मला सांगितले आहे की, काही करुन पवारांकडे जा. नगरमध्ये निलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या, अशी विनंती त्या उद्योगपतीने केली. 

अहमदनगरसाठी निलेश लंके यांचे नाव आले तेव्हा विखे-पाटलांची झोप उडाली. विखे-पाटलांनी कधीही माझ्या दारात पाऊल टाकलं नाही, पण निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये, यासाठी त्यांनी त्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले. यावरुन एक स्पष्ट होते की, सत्ता आणि साधनं असतील तरी माणुसकी, सामान्य माणसांचं प्रेम हा खजिना आहे. त्यामुळे निलेश लंकेंचा पराभव करणे शक्य नाही.', असे शरद पवार जाहीर सभेत म्हणाले.

या लोकांना आत्मविश्वास नाही- शदर पवार

'मी टीका करणाऱ्यांवर जास्त बोलणार नाही. पण माझ्यामुळे आणि बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांना कधी ना कधी मदत झाली आहे, ते (विखे) विसरले. या लोकांबद्दल काय सांगायचे, या लोकांनी किती पक्ष बदलले, पहिले शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, विरोधी पक्षनेतेपद उपभोगलं, ते सोडून दिलं आणि भाजपमध्ये आले. आता ते भाजपमध्ये मंत्री झाले आहेत, तरीही लोकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. या लोकांना आत्मविश्वास नाही. निवडणुकीला उभं राहिल्यावर निलेश लंके यांच्यामुळे त्यांची चिंता नक्की वाढली असेल,' अशा स्पष्ट शब्दात शरद पवारांनी खडेबोल सुनावले. 

    follow whatsapp