उद्धव ठाकरेंचा पक्ष अन् मोर्चा दोन्हीही नॅनोच! ‘मविआ’च्या महामोर्चाची फडणवीसांकडून खिल्ली

मुंबई तक

17 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:34 AM)

एवढा लहानसा मोर्चा निघाला. आम्हाला हे आधी माहिती होतं, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या. पण त्यांच्याजवळ आझाद मैदानात येण्याएवढी संख्या राहणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो अशा जागा त्यांनी घेतली. मग या मोर्चाचे कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं? जसा त्यांचा पक्ष नॅनो होत […]

Mumbaitak
follow google news

एवढा लहानसा मोर्चा निघाला. आम्हाला हे आधी माहिती होतं, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या. पण त्यांच्याजवळ आझाद मैदानात येण्याएवढी संख्या राहणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो अशा जागा त्यांनी घेतली. मग या मोर्चाचे कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं? जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा मोर्चा ही नॅनो झाला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या महामोर्चावर केली. ते मुंबईत जीएसटी बैठकीनंतर बोलत होते.

हे वाचलं का?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काही वादग्रस्त विधानं, भाजप नेत्यांकडून केली गेलेली काही वक्तव्य या सगळ्याचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीचा राज्यव्यापी महामोर्चा निघाला. यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वंच प्रमुख नेते सहभागी झाले होते.

या मोर्चाबाबत बोलताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

कोणत्या तोंडाने मोर्चा काढतायत?

खरं म्हणजे कुठचा मोर्चा? हा केवळ राजकीय मोर्चा आहे. कारण जे लोक संतांना शिव्या देतात, देवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही अशा प्रकारची मंडळी कोणत्या तोंडान हा मोर्चा काढताय? महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राचे जे मानक आहे त्यांचा अपमान होऊच नये या मताचे आम्ही देखील आहोत. तो जर कोणी करत असेल तर तो योग्य नाही, ते वारंवार सगळ्यांनी सांगितलं आहे. पण जाणीवपूर्वक त्याला राजकीय मुद्दा बनवला जातो आहे.

स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अपमानावेळी उद्धव ठाकरे कुठे होते?

माझा सवाल आहे आणि विशेषतः तो ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान केला, त्यावेळी तुम्ही मोर्चा का नाही काढला? त्यावेळी त्यांच्यावर तुम्ही का नाही बोललात? स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोठे नाहीत का? मला असं वाटतं की केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहतील.

सीमा प्रश्न निर्माण करणारा काँग्रेसच्या व्यतिरिक्त आहे कोण?

आज हे तीन पक्ष हे विसरले आहेत की कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद 60 वर्षांपासून आहे. आणि वारंवार या लोकांनी राज्य केलं त्यांनी त्यात काहीही केलेलं नाही. आता कोणत्या तोंडाने सांगतात? सीमा प्रश्न निर्माण करणारा काँग्रेसच्या व्यतिरिक्त आहे कोण? कशा प्रकारचा अन्याय त्यावेळी महाराष्ट्रावर केला आणि त्यानंतर सातत्याने केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांनी तयार केलेल्या प्रश्नावरच आता हे सगळं चाललेलं आहे.

उद्धव ठाकरेंची कॅसेट तिथचं अडकलेली :

मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांची कॅसेट तिथेच अडकली आणि गेल्या 10 वर्षांपासून तिथेच अडकली आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही. हे माहिती असताना किती दिवस तेच ते डायलॉग ते मारणार आहेत. आज तर त्यांच्या भाषणामध्ये एकही नवीन मुद्दा नाही. केवळ शिवराळ भाषा वापरायची एवढ्या पुरता त्यांनी भाषण केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी आता काही नवीन लोकं नेमून घेतली पाहिजे. ज्यामुळे काही तरी नवीन काही तरी मोठ्या नेत्यानं भाषण केलयं असं वाटेल, एवढी माझी माफक अपेक्षा आहे.

कशाच्या वल्गणा करताय? : अजित पवारांना टोला

अजित पवार यांच्या हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाका खालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केलं. कशाच्या वल्गणा करताय? हे सरकार टिकणार, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणूक लढणार आणि पुन्हा आमचं सरकार या महाराष्ट्रात येणार.

    follow whatsapp