हे नुकसान आता भरुन निघणारं नाहीये! Taukte वादळाने कोकणातल्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं

मुंबई तक

• 02:23 PM • 21 May 2021

तौकताई वादळाचा फटका महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला बसला. दोन दिवसांत सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे कोकणात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. वादळाचा धोका टळल्यानंतर आता राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. परंतू कोकणातला शेतकरी झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल या चिंतेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात घावनळे गावातील शेतकरी संजू नेरुरकर यांच्या ३० एकर जमितीनील आंबा आणि […]

Mumbaitak
follow google news

तौकताई वादळाचा फटका महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला बसला. दोन दिवसांत सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे कोकणात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. वादळाचा धोका टळल्यानंतर आता राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. परंतू कोकणातला शेतकरी झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल या चिंतेत आहे.

हे वाचलं का?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात घावनळे गावातील शेतकरी संजू नेरुरकर यांच्या ३० एकर जमितीनील आंबा आणि काजू शेतीचं चक्रीवादळामुळे नुकसान झालंय. या तक्रीवादळात नेरुरकर यांना झालेलं नुकसान हे अंदाजे दीड कोटींच्या घरात आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच असल्यामुळे आता या संकटातून सावरायचं कसं हा प्रश्न नेरुरकर यांना पडला आहे.

“या वादळात माझी आंब्याची जवळपास १५० झाडं पडली आहेत. फळांचं नुकसान झालंय. या फळातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. झाडांची मशागत, खतं, नोकरांचे पगार हा सगळा खर्च यातून भागवला जातो. एक आंब्याचं झाड लागून त्याला फळं यायला सुरुवात झाली की ते किमान एक ते दीड लाखाचं उत्पन्न देतं. माझ्या बागेतली दीडशे झाडं कोसळल्यामुळे नुकसान हे १ कोटीच्या घरात गेलंय.” नेरुरकर मुंबई तक शी बोलत होते.

चक्रीवादळामुळे कोकणत्यातल्या शेतकऱ्याच्या शेतीसोबत इतरही नुकसान झालंय. गेले ५-६ दिवस लाईट नसल्यामुळे इतर काम करण्यासाठी नेरुरकरांना त्रास जाणवतो आहे. वादळात कोकणात बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. आपलं झालेलं नुकसान हे इतक्या लवकर भरुन निघणारं नाहीये याची नेरुरकरांना जाणीव आहे. त्यामुळे शासनाने कोकणातल्या बागायती शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना पॅकेज देण्याची विनंती केली आहे. शासनाने मदत केली तर आम्ही आमच्या बागायती शेतीकडे लक्ष देऊ असंही नेरुरकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचा दौरा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत पुरवावी असे आदेश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच तौकताई वादळाचा फटका बसल्यामुळे कोकणातला शेतकरी पुरता कोलमडला आहे. सरकारी पॅकेज मिळालं तरच आता आम्ही उभे राहू शकतो. “आम्ही खचून गेलोय, आंबा आणि काजूची झाडं पडलेली पाहिली की आता या शेतीचं करायचं काय हा प्रश्न पडतो. अद्याप कृषी अधिकारी पंचनाम्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी”, अशी विनंती नेरुरकर यांनी केली आहे.

    follow whatsapp