पाटील-बांगरांविरुद्ध नवघरे अन् टारफे एकवटले : हिंगोलीत ‘मविआ’-शिंदे गटातील संघर्ष टोकाला

मुंबई तक

• 09:39 AM • 04 Oct 2022

हिंगोली : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. सोबतच निधीच्या वाटपामुळे काही विकासकामांना स्थगिती तर काही निर्णयही बदलले. याचमुळे हिंगोलीत सध्या ‘मविआ’ विरुद्ध शिंदे गट संघर्ष टोकाला गेला असून खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे आणि शिवसेनेचे संतोष टारफे एकवटले आहेत. काय […]

Mumbaitak
follow google news

हिंगोली : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. सोबतच निधीच्या वाटपामुळे काही विकासकामांना स्थगिती तर काही निर्णयही बदलले. याचमुळे हिंगोलीत सध्या ‘मविआ’ विरुद्ध शिंदे गट संघर्ष टोकाला गेला असून खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे आणि शिवसेनेचे संतोष टारफे एकवटले आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले आमदार राजू नवघरे?

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार नवघरे म्हणाले, वसमतमध्ये अनेक कामांना स्थगिती देऊन संबंधित निधी शिंदे गटाकडे वर्ग केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत (राजू ) नवघरे यांनी केला आहे. ते म्हणाले, मोठ्या प्रयत्नांनंतर वसमत येथे 65 एकर जागेवर मॉर्डन मार्केट उभारलं जाणार होतं. यासाठी महसूल विभागाने 65 एकर जागा पणन मंडळाला भाडेतत्त्वावर दिली होती. या कामासाठी निधी मिळविला होता.

इथे केळी, हळद, कापूस, कोसला, करवंद, भुसार मालाचं मार्केट उभारलं जाणार होतं, देशभरातील व्यापारी ऑनलाईन पद्धतीने इथे ग्रिडिंग करणार होते. एकाच ठिकाणी शेती अवजारे, खतं, औषधं, बी बियाणं आणि प्रक्रिया उद्योग उभारले जाणार होते. मागच्या मविआ सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. परभणी हिंगोली नांदेड येथील 15 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार होता, याशिवाय 5 हजार तरुणांना मॉर्डन मार्केटच्या रूपाने रोजगार ही मिळणार होता.

पण शिंदे सरकारने मॉर्डन मार्केटची जागा हळद संशोधन केंद्राला दिली, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील या हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत. या निर्णयामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून 5 हजार तरुणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. तसेच ही जागा हळद संशोधन केंद्रासाठी योग्य नसून त्यासाठी भुसभुशीत पाणी झिरपणारी शेती असावी लागते. तशी जागा आम्ही हळद संशोधन केंद्रासाठी सुचवू.

याशिवाय शिरडशहापुरमधील आदिवासी मुलांच्या निवासी शाळेसाठी देऊ केलेला 30 कोटींचा निधीही कळमनुरी मतदारसंघात वळवावा असे पत्र आमदार संतोष बांगर यांनी दिले असल्याचा आरोप नवघरे यांनी केला. विरोधकांच्या मतदार संघात होत असलेला विकास खोडून, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विकास रोखून विकास कामे करण्याचा शिंदे सरकारने घाट घालू नये. अन्यथा आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असा इशाराही नवघरे यांनी दिला.

संतोष टारफेंचा इशारा :

दरम्यान, आदिवासी समाजाच्या विकासामध्ये कोणीही राजकारण करू नये आणि शाळेच्या कामाला मिळालेला निधी आश्रम शाळेस वापरावा या करिता विद्यार्थी-पालकांनी वसमतमध्ये निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला शिवसेनेकडून देखील पाठिंबा देण्यात आला. तसेच शाळेच्या विकासासाठी आलेला निधी मिळाला नाही तर सर्वपक्षीय आंदोलन करु. अन्यथा संतोष बांगर यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संतोष टारफे यांनी केली.

    follow whatsapp