एकाच वेळी दोन संघ मैदानात, याआधीही २३ वर्षांपूर्वी BCCI ने केला होता प्रयोग

मुंबई तक

• 11:08 AM • 21 May 2021

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर जुन महिन्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरु होईल. भारतीय संघ इंग्लंड आणि श्रीलंकेचा दौरा करणार असल्यामुळे बीसीसीआयने एकाचवेळी दोन भारतीय संघ मैदानावर उतरवण्याचं ठरवलंय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रमुख भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये WTC ची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळेल. तर याच दरम्यान तरुणांचा भारतीय संघ […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर जुन महिन्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरु होईल. भारतीय संघ इंग्लंड आणि श्रीलंकेचा दौरा करणार असल्यामुळे बीसीसीआयने एकाचवेळी दोन भारतीय संघ मैदानावर उतरवण्याचं ठरवलंय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रमुख भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये WTC ची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळेल. तर याच दरम्यान तरुणांचा भारतीय संघ लिमीटेड ओव्हर सिरीजसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाईल.

हे वाचलं का?

परंतू एकाच वेळी दोन संघ मैदानावर उतरवण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाहीये. १९९८ मध्ये सहारा कप आणि क्वाललांपूरमध्ये भरवण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन हे एकाच वेळी करण्यात आलं होतं. ज्यासाठी भारताने आपले दोन संघ मैदानावर उतरवले होते. अजय जाडेजाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या खेळाडूंचा संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तर मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली सौरव गांगुली, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद या खेळाडूंचा संघ सहारा कप स्पर्धेसाठी उतरला होता.

महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआय सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ पाठवण्याच्या तयारीत नव्हतं. परंतू या विषयावर चर्चा आणि वाद-विवाद झाल्यानंतर अखेरीस बीसीसीआयने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघ मैदानात उतरवला होता. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा समावेश ब गटात अँटीग्वा, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्यासोबत करण्यात आला होता. तसेच या सामन्यांना List A क्रिकेटचा दर्जा देण्यात आला होता. हे सामने लाल बॉलवर पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळवण्यात आले होते.

कोच म्हणून राहुल द्रविडची आतापर्यंत कामगिरी कशी? जाणून घ्या…

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. परंतू कॅनडाविरुद्ध सामना जिंकून भारताने आपलं आव्हान कायम राखलं. परंतू अँटीग्वाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं. परंतू या पराभवानंतरही वाद थांबले नाहीत. BCCI ने राष्ट्रकुल स्पर्धेतलं आव्हान संपल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सहारा कपसाठी काही खेळाडूंना टोरांटो येथे पाठवण्याचं ठरवलं. परंतू पाक क्रिकेट बोर्डाने याला आक्षेप घेतला. संघ जाहीर करताना स्थान नसलेल्या खेळाडूंना आता संघात घेता येणार नाही असं पाक क्रिकेट बोर्डाने सांगितलं. अखेरीस सचिन आणि अजय जाडेजा यांना सहारा कपसाठी भारतीय संघात स्थान देण्याचा तोडगा काढण्यात आला.

पाकिस्तान मालिकेत २-१ ने आघाडीवर असताना जाडेजा सहारा कपमधला चौथा सामना खेळला. परंतू सचिन तेंडुलकर यावेळी आपल्या परिवारासोबत खंडाळ्याला ट्रिपला गेल्यामुळे बीसीसीआयची चांगलीच गोची झाली. अखेरीस सचिन शेवटच्या सामन्यासाठी हजर झाला परंतू तोपर्यंत पाकिस्तानने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली होती. अखेरीच्या सामन्यात सचिनने सौरव गांगुलीच्या सहाय्याने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू या सामन्यातही पाकिस्तानसमोर भारताची डाळ शिजली नाही आणि पाकिस्तानने ४-१ ने सहारा कप जिंकला होता.

IPL 2021 साठी BCCI ची तयारी सुरु, टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदल करण्याची ECB ला विनंती

    follow whatsapp