बंडाच्या चर्चेवर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसमोरच सांगितला प्लॅन
अजित पवारांनी नंतर बंडाच्या चर्चा फेटाळल्या. त्यामुळे मुंबईतील सभेत तरी अजित पवार बोलणार का आणि बोलले तर बंडाबद्दल, महाविकास आघाडीबद्दल काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
ADVERTISEMENT

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आणि बंडाच्या बातम्यांवरून पंधरा दिवस चांगलाच गदारोळ झाला. नागपूरमधील वज्रमूठ सभा ते मुंबईतील सभेपर्यत महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार की नाही याबद्दलही उलटसुलट बोललं गेलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर 1 मे रोजी मुंबई मविआची सभा झाली. या सभेत अजित पवारांनी बंडाच्या चर्चेबद्दल ठाकरेंसमोरच थेट भाष्य केलं. अजित पवार नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या नागपूरमधील वज्रमूठ सभेत अजित पवारांनी भाषण केलं नाही. बंडाच्या तयारीत असल्यामुळे अजित पवारांनी भाषण टाळल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. पण अजित पवारांनी नंतर बंडाच्या चर्चा फेटाळल्या. त्यामुळे मुंबईतील सभेत तरी अजित पवार बोलणार का आणि बोलले तर बंडाबद्दल, महाविकास आघाडीबद्दल काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
हेही वाचा >> “टिल्ली, टिल्ली लोकं पण बोलायला लागली…” : अजित पवारांनी कोणाला फटकारलं?
यासोबतच महाविकास आघाडीचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर अजित पवार बंडाच्या चर्चेविषयी काय बोलतात याबद्दलही राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार मविआ मुंबई सभेला आले. सर्वांची भाषणं ऐकली. संजय राऊतांनी केलेलं तोंडभरून कौतुकही लक्ष देऊन ऐकलं आणि पवार बोलले. 17 मिनिटांच्या भाषणात बंडाच्या चर्चेचाही ओझरता उल्लेख केला. नेमकं काय म्हणाले, ते तुम्हीच बघा.
अजित पवार बंडाच्या चर्चेबद्दल वज्रमूठ सभेत काय बोलले?
बीकेसी मैदानात झालेल्या वज्रमूठ सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या आलेल्या बातम्या आणि चर्चांवर स्पष्ट भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “अलीकडच्या काळात न विचारताच कुणी काहींना काही बातम्या देत असतं. त्याच्यामुळे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता संभ्रमावस्थेत राहते. त्या गोष्टीवरही विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची विनंती या वज्रमूठ मेळाव्याच्या निमित्ताने, सभेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांना करतो”, असं अजित पवार या सभेत बोलले.
अजित पवार पुढे असंही म्हणाले की, “हे सरकार आपल्यापासून कोणत्याही निवडणुका, मग विधान परिषदेच्या असतील, विधानसभेच्या पोटनिवडणुका असतील. काल झालेल्या बाजार समितीच्या निवडणुका असतील… बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे. जनता आपल्याबरोबर आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. नाकारता येणार नाही. आपण एकजूट राहून या सर्वांशी मुकाबला करण्याची गरज आहे. माझी आपल्याला विनंती आहे”, असं म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडी आणखी मजबूत करण्याचं आवाहन मित्रपक्षांना केलं.
अजित पवारांच्या बंडाच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येही संभ्रमावस्था झाल्याचं बघायला मिळालं होतं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनीही यावर स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. पण, अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरूनच यावर भाष्य केलं. अजित पवारांनी बंडाच्या चर्चांमुळे कार्यकर्ते, जनतेच्या मनात निर्माण गोंधळाबरोबरच अजित पवारांनी मित्रपक्षांच्या नेत्याचाही संभ्रम दूर केला.
हेही वाचा >> एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पद गमावलं तर काय? जनतेने दिला ‘हा’ कौल
अगदी एका ओळीत अजित पवारांनी बंडाच्या चर्चेचा उल्लेख केला. पण ज्या पद्धतीनं पवारांनी तो उल्लेख केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कारभाराचे वाभाडे काढले, फडणवीसांना सवाल केले, त्यावरून आता महाविकास आघाडीचं अस्तित्व आणखी मजबूत झाल्याचं म्हटलं जातंय.