इर्शाळवाडी : दरडीने गिळलं गाव, 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली

मुंबई तक

20 Jul 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 11:20 AM)

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी गाव आहे. या गावावर 20 जुलै रोजी रात्री दरड कोसळली. यात 5 जणांचा मृत्यू झाला.

Khalapur a massive landslide in irshalwadi village in raigad district.

Khalapur a massive landslide in irshalwadi village in raigad district.

follow google news

Irshalwadi Landslide News : गुरुवारची (20 जुलै) सकाळ महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊनच उगवली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावाचा दरडीने घास घेतला. इर्शाळगडाच्या डोंगराचा एक भाग इर्शाळवाडी गावावर कोसळला. 48 घरांची ही वाडी असून, मध्यरात्री ही घटना घडली असून, 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून, एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव व मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही घटनास्थळी दाखल झाले असून, इर्शाळवाडीच्या घटनेने माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

हे वाचलं का?

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी गाव आहे. हे गाव कर्जत तालुक्यात येते. गुरूवारी पहाटे (20 जुलै) लोक गाढ झोपेत पावसामुळे असतानाच गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांकडून तातडीने बचाव व मदत कार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार 75 जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 जणांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावाला भेट दिली. परिस्थिती पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

इर्शाळवाडी गावातील स्थितीची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “जी आपातकालीन यंत्रणा आहे, मग त्यात एसडीआरएफ आहे. एनडीआरएफ आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आपतकालीन यंत्रणा अलर्ट आहेत. जिथे जिथे गरज असेल, तेथील लोकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांची गैरसोय, त्रास, जीवितहानी होणार नाही, याच्या सूचना दिल्या आहेत.”

इर्शाळवाडीवर कोसळली दरड : देवेंद्र फडणवीसांनी काय दिली माहिती?

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेत मृत पावलेल्यांबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मदत व बचाव मोहिमेबद्दल माहिती दिली आहे.

फडणवीसांनी म्हटलेलं आहे की, “रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

पाऊस आणि अंधारामुळे मदत कार्यात अडथळे

फडणवीसांनी सांगितलं की, “ही घटना कळताच काल (20 जुलै) मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे.”

“प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंची राज्य सरकारला महत्त्वाची सूचना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारला एक महत्त्वाची सूचनाही केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “रायगड जिल्ह्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावावर दरड कोसळली. येथे जिवितहानी झाली असल्याचे समजते. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

“मदत आणि बचावकार्य सुरु असून नागरीकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा कार्यवाही करत आहेत. याचबरोबर या भागातील इतर गावांना देखील सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. पुणे जिल्ह्यातील माळीण व आताच्या दुर्घटनेपासून धडा घेऊन अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने वसलेली गावे शोधून पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे ही विनंती”, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

    follow whatsapp