Shiv Sena UBT: 'आम्ही औरंगजेबाला झुकवलंय, अमित शाह हे किस झाड़ की..' उद्धव ठाकरेंची तुफान टीका

'आम्ही औरंगजेबाला गाडलं आहे. अमित शाह हे किस झाड़ की पत्ती है?' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर मेळाव्यातून अमित शाहांवर टीका केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Jan 2025 (अपडेटेड: 24 Jan 2025, 02:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्र्यांवर तुफान टीका

point

भाजपच्या विरोधात ठाकरेंनी केली बरीच टीका

point

स्वबळावर निवडणुका लढविण्याचेही दिले संकेत

मुंबई: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना  (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित केले. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवत ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अजूनही धक्कादायक आहेत पण अमित शहा माझे भविष्य ठरवू शकत नाहीत.'

हे वाचलं का?

अमित शहांवर तीव्र हल्ला चढवत ते म्हणाले, 'आम्ही औरंगजेबाला झुकवलं आहे. अमित शाह हे किस झाड़ की पत्ती है? जर महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छेनुसार निकाल लागला असता तर दिल्लीतील सरकार हादरले असते. मी अमित शहांना उत्तर देत राहीन. जखमी वाघ काय करू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो.'

हे ही वाचा>> Big Breaking: 'एकटं लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय...', उद्धव ठाकरेंच्या घोषणेने प्रचंड मोठी खळबळ

आरएसएसवरही हल्लाबोल

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, महाराष्ट्रात 90 हजार कार्यकर्ते आले होते, ते आरएसएसचे कार्यकर्ते होते. जर आज महाराष्ट्राला रक्ताची गरज असेल तर शिवसैनिक ते देतील. आरएसएस फक्त गोमूत्र देईल. आयआयटी बंगळुरूचे प्रमुख म्हणत आहेत की मला ताप आला होता आणि मी उपचार म्हणून गोमूत्र घेतले.'

हे ही वाचा>> उद्धव ठाकरेंची खळबळ उडवणारी 'ती' घोषणा, 'महाविकास आघाडी' तुटणार?

शिंदेंना पुन्हा म्हटलं गद्दार

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, 'गद्दरा बीकेसीमध्ये सभा घेत आहेत. महाराष्ट्राचा नाश करण्यासाठी गद्दारांचा वापर केला जात आहे. ते अमित शाहांमुळे जिंकले असतील. एकदा बीएमसी निवडणुका संपल्या की, गद्दारांचा भाजपला काहीही उपयोग होणार नाही. त्यांना कशी वागणूक दिली जाते हे आपण आधीच पाहू शकतो. सत्तेतील सहभागापासून वंचित राहिल्यानंतर आता ते (एकनाथ शिंदे) गावी जात आहेत.'

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'ते म्हणत होते की, मी 92 च्या दंगलीबद्दल माफी मागितली आहे. ही खोटी बातमी होती. बाबरी पाडणे ही एक मोठी चूक होती असे अडवाणी म्हणाले होते. देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला स्वीकारले आहे. त्यांना यात अडचण आहे. भाजपने आपल्या झेंड्यावरून हिरवा रंग काढून टाकावा.'

स्वबळावर लढण्याचे थेट संकेत

'अमित शाहांना जागा दाखवणार आहात? ठीकए... अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. पण मला तुमची जिद्द बघू द्या.. तुमची तयारी बघू द्या.. ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून आधी बाहेर या. ज्याक्षणी माझी खात्री पटेल की, आपली तयारी झालीए.. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही.' 

'पण यावेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड.. सूड आणि सूड.. होय सूड.. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवर वार करतो. तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये.' 

'जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शाहांना सांगतो की, जास्त आमच्या नादी लागू नका.. आज थोडासा ट्रेलर दाखवला आहे. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल.' असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.

 

    follow whatsapp