Badlapur Thane School case: 'शाळाही भाजपच्या लोकांशी संबंधित...', बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई तक

20 Aug 2024 (अपडेटेड: 20 Aug 2024, 03:01 PM)

Uddhav Thackeray allegation Badlapur school case: बदलापूरमध्ये चार वर्षांच्या मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी बोलताना उद्धव ठाकरेंनी एक गंभीर आरोप केला आहे.

बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

follow google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

point

बदलापूरमधील आदर्श विद्यालय भाजपच्या लोकांशी संबंधित असलाचा ठाकरेंचा आरोप

point

'भाजपचाही कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे' 

Badlapur adarsh school news: बदलापूर: बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयातील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज (20 ऑगस्ट) सकाळी 11 वाजेपासूनव संतप्त आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर उतरून लोकल सेवाच बंद पाडली आहे. तसंच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागलं आहे. याच घटनेबाबत बोलताना शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (badlapur school case that school also belongs to bjp people uddhav thackeray serious allegation on case of sexual abuse of 4 year old girls in badlapur)

हे वाचलं का?

बदलापूरमधील ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली ती आदर्श विद्यालयात शाळा ही भाजपच्या लोकांशी संबंधित होती असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

'बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा असुरक्षित', उद्धव ठाकरेंची सरकार टीका

या घटनेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे. या घटना हल्ली संपूर्ण देशात वारंवार घडतायत. आपल्याकडे अशी घाणेरडी पद्धत सुरु झालेली आहे. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जात आहे. माझं मत असं आहे की, संजय राऊत यांनी ते सामनाच्या अग्रलेखातही लिहिलेलं आहे. एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहे.'

हे ही वाचा>> Crime: बदलापूर हादरलं! चिमुरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी काढला मोर्चा

'आपण कुठलातरी एखादा विषय घेऊन एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये. आणि या घटनेला जे गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना लवकरात लवकर केस चालवून अगदी फास्ट ट्रॅकवर म्हणा किंवा काही म्हणा. आपल्याकडे अनुभव आहे गेल्या काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये निर्भयाकांड झालेलं होतं. निर्भयाचे आरोपी पकडले. गुन्हे सिद्ध झाले. पण त्याच्या आरोपींना किती वर्षांनी फाशी दिली गेली? मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण?'

'जेवढे महिलांवर अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात. तसेच त्याचा न्यायनिवाडा करुन शिक्षेला दिरंगाई करणारेसुद्धा जबाबदार धरले पाहिजेत. हे जर झालं तरच अशा गोष्टींना आळा बसेल. तूर्त मी एवढच म्हणेन की, अशा घटनेचं राजकारण न करता, जसं हाथरस, उन्नाव, राजस्थानात काही घडलं ते आता बदलापूरमध्ये घडलं. त्यामुळे कुठेही काही घडलं तरी ते सुटता कामा नये. सगळेजण पक्षभेद, जातपात विसरुन एकत्र झाले तरच आपल्या देशातील आणि राज्यातील महिला सुरक्षित राहतील. आणि तरच आपण म्हणून शकतो की माझ्या राज्यातील महिला ही माझी लाडकी बहीण आहे.'

हे ही वाचा>> Badlapur Crime : चिमुकलीच्या अत्याचाराच्या घटनेची शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल, दीपक केसरकर काय म्हणाले?

'शक्ती विधेयक जे आम्ही आणू इच्छित होतो, त्याचा मसुदा तयार झाला होता. सर्वांना कल्पना आहे की त्यावेळी जे अधिवेशनं होत ते एक-दोन दिवसांचं होतं, कारण तेव्हा करोनाचा काळ होता. पण हे विधेयक आम्ही आणू शकलो नाही, कारण आमचं सरकार गद्दारी करुन पाडलं गेलं. ज्यांनी हे सरकार गद्दारी करुन पाडलं आणि हे विधेयक लटकवून ठेवलं त्यांची जबाबदारी आहे की शक्ती विधेयकाची शक्ती गुन्हेगारांना दाखवून द्यावी.' 

'मला असं कळलं की ही, शाळाही भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी यात राजकारण आणत नाही. पण इतर ठिकाणीही कुणी राजकारण करु नये. यात कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपचाही कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.' 

'काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीत हिट अँड रन झालं होतं. मिहीर शाह त्याचं नाव. त्या महिलेला त्यानं फरफटत नेलं, पुढे काय झालं? पुण्यातील त्या आरोपीकडून निबंध लिहून त्याला का सोडलं? आत्तासुद्धा भाजपचे कार्यकर्ते यात असतील त्यांनाही निबंध लिहून सोडून देणार का? संपूर्ण जग आता बघतंय. मी पुन्हा सांगतोय, कोणतंही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.'

'ती कारवाई म्हणजे नुसती अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केसं चालली. निकाल लागला. वर्षानुवर्ष निकालावर अंमलबजावणी होत नाही. त्या सगळ्यावर आता जरब बसायला पाहिजे. तरच आपण महिलांना लाडकी बहीण म्हणू शकू..' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. 

    follow whatsapp