‘चोमडेगिरी vs चाटुगिरी’, नाना पटोलेंचा सुटला संयम, संजय राऊतही भिडले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वार प्रतिवार सुरू झाले आहेत.

Maharashtra Politics : word war in sanjay raut and nana patole

Maharashtra Politics : word war in sanjay raut and nana patole

योगेश पांडे

03 May 2023 (अपडेटेड: 03 May 2023, 07:29 AM)

follow google news

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक वार रंगलेलं दिसलं. या दोन्ही नेत्यांतील राजकीय वादावर पडदा पडत नाही तोच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वार प्रतिवार सुरू झाले आहेत. संजय राऊतांनी ही चोमडेगिरी बंद करावी या नाना पटोलेंच्या विधानाला संजय राऊत यांनी चाटुगिरी कोण करतंय हे भविष्यात कळेल, असं म्हणत प्रहार केलाय.

हे वाचलं का?

काँग्रेसमध्ये मल्लिकार्जून खरगे हे निर्णय घेत नाहीत, तर राहुल गांधी हे निर्णय घेतात, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्या विधानाबद्दल पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला.

या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “ही चोमडेगिरी संजय राऊत यांनी बंद केली पाहिजे. कारण की ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही. आणि गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं होतं, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या परिवाराचं बलिदान आहे. ज्या परिवारांने पंतप्रधान पद सोडलेलं आहे.”

हेही वाचा >> राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!

“काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर असताना राहुल गांधींनी ते पद सोडलेलं आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाही राहुल गांधींनी ते पद घेतलं नाही. मल्लिकार्जून खरगे यांच्या रुपाने एक ज्येष्ठ नेते निवडून आले आहेत. एका अनुभवी व्यक्तीला, एका मागास जातीचे असल्यामुळे संजय राऊत टीका करतात का? हा प्रश्न निर्माण होतो.”

“त्यांच्या कार्यशक्तीवर टीका करतात, हा प्रश्न निर्माण होतो. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी कुणाच्या पक्षाचे प्रवक्ते बनावे, हे अजितदादांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही चोमडेगिरी त्यांनी थांबवावी. उद्या असं म्हणता येईल का की उद्धव ठाकरे निर्णय घेत नाहीत, संजय राऊत निर्णय घेतात. अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्या पक्षाबद्दल बोलत नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊतांनी वारंवार करावं हे चुकीचं आहे”, अशा शब्दात नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला.

संजय राऊतांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर

“ही चोमडेगिरी का करतात, असं नाना पटोले बोलले असतील हे मला माहिती नाही. त्यांच्या पक्षाविषयी कुणीच काही बोलत नाही. त्यांच्या पक्षाविषयी शरद पवारांनी भूमिका मांडलीये, त्यांच्या पुस्तकात. त्यांनी त्यावर बोललं पाहिजे. आणि चाटुगिरी कोण भविष्यात करतंय, हे येणारा काळ ठरवेल.”

संजय राऊत पुढे म्हणाले, “शिवसेनेनं कधीही अशी भूमिका घेतलेली नाही. आपण महाविकास आघाडीत आहोत, आपण आपल्या तोंडावर बंधने घाला. तुमच्याविषयी आम्ही बोलायला लागलो, तर चोमडे कोण आणि चाटु कोण याचा खुलासा होईल, पण मला त्याविषयी बोलायचं नाही. परवाच ते व्यासपीठावर भेटले आणि प्रेमाने बोलले. हे खरोखर बोलले असतील, तर पाहावं लागेल. काँग्रेस पक्षाविषयी कोणतंही विधान आम्ही केलेलं नाही. त्यांच्याकडे कुणाचा रेडिओ आहे, हे मला माहिती नाही.”

हेही वाचा >> Sharad Pawar : अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय पवारांनी एकट्यानेच का घेतला?

“महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यांनी नाही हे कुणीही सांगू नये. या देशात लोकशाही आहे. या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि महाविकास आघाडीवर परिणाम होणार असेल, विरोधी पक्षाच्या ऐक्यावर परिणाम होणार असेल, तर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र कायम राहिल पक्ष निघून जातील”, असं म्हणत संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला.

    follow whatsapp