'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा?', राधाकृष्ण विखे-पाटलांचं चक्रावून टाकणारं उत्तर

धनंजय मुंडेंवर सध्या अनेक आरोप विरोधकांकडून होत आहे. अशावेळी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? या प्रश्नाला उत्तर देताना राधाकृष्ण विखे-पाटलांनी एक मोठं विधान केलं आहे.

(फाइल फोटो)

(फाइल फोटो)

मुंबई तक

• 10:56 PM • 02 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडेंनी राजीनाम्याबाबत विखे-पाटलांचं मोठं विधान

point

पाहा राधाकृष्ण विखे-पाटील काय म्हणाले

point

धनंजय मुंडे राजीनामा देणार?

पंढरपूर: संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण वातवरण ढवळून निघालं आहे. अशातच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली असून त्यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. अशावेळी चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे. अशातच आता कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र मोठं विधान केलं आहे.  

हे वाचलं का?

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे का? या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट म्हटलं की, 'एसआयटीचा चौकशी अहवाल येऊ दे मग निर्णय होईल.' त्यांच्या या विधानाने आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिथे त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनामा विषयी विचारण्यात आलं. 

पाहा राधाकृष्ण विखे-पाटील नेमकं काय म्हणाले.. 

'धनंजय मुंडेंचा जो विषय आहे.. सध्या जी काही कायदेशीर कारवाई सुरू आहे. सत्य काय आहे, त्यांच्याबद्दल विनाकारण काही रान पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे का. आता एसआयटी स्थापन केलेली आहे. ती घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. सत्य बाहेर येईल त्याप्रमाणे तो पक्ष निर्णय करेल.'

'विरोधी पक्षाचं कामचं आहे आरोप करण्याचं. पण जी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे आणि त्यांचा जो अंतिम अहवाल येईल त्यावर कारवाई होईल.' असं विखे-पाटील म्हणाले.

प्रश्न: एवढे आरोप होत असताना धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे का?

'एसआयटीचा चौकशी अहवाल येऊ दे मग निर्णय होईल.' असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.

विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडे काय म्हणाले? 

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आजच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, 'मी राजीनामा द्यावा याचं काही तरी कारण लागेल ना? या कुठल्याही प्रकरणात मी ना आरोपी आहे, ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थाअर्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा बाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा. अशा पद्धतीने माझा राजीनामा काही जणं मागतायेत.'

'विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. पण अशा पद्धतीचं छोटा आका, मोठा आका ही पहिल्यांदाच भाषा मी ऐकतो आहे. कोणाचा एन्काउंटर आणि कोणाचं काय.. या अशा गोष्टी नाहीए. पोलीस प्रशासन आणि सीआयडी हे व्यवस्थितपणे तपास करत आहेत.' 

'एक लक्षात घ्या हा तपास सीआयडीकडे दिला आहे. यामुळे त्या तपासाशी कोणत्याही प्रकारचा प्रभाव हा मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही. म्हणून या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशा तीनही प्रकारच्या चौकशी सुरू आहेत.' असं मुंडे म्हणाले.

    follow whatsapp