मुंबई: संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तींयांना देखील अटक झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्या सरकारवर त्याचा दबाव वाढत आहे. अशातच काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट सागर बंगल्यावर दाखल झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मागील तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
धनंजय मुंडे यांनी आज (6 जानेवारी) सकाळीच मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तासभर अजितदादांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फक्त असं म्हटलं की, 'नववर्षानिमित्त मी अजितदादांची भेट घेतली आणि त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच माझ्या अन्न व पुरवठा या खात्याच्या पुढील कामांविषयी त्यांच्याशी चर्चा केली.'
हे ही वाचा>> Suresh Dhas Parbhani : अजितदादा क्या हुआ ते वादा? बीडमधील परिस्थिती सांगत सुरेश धस यांचा तुफान हल्लाबोल
मात्र, धनंजय मुंडे हे तब्बल तासभर अजित पवारांसोबत चर्चा करत होते. अशावेळी या भेटीमध्ये नेमकं काय घडलं? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण अधिक तापल्यानंतर आणि धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांना अटक केल्यानंतर अजित पवार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, मागील जवळजवळ दोन आठवडे अजित पवार यांनी यावर काहीच भाष्य केले नव्हते.
काही दिवसांसाठी अजित पवार हे परदेशी गेले होते. त्यानंतर ते शनिवारी (4 जानेवारी) भारतात परतले होते. त्यामुळे सोमवारी धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेत चर्चा केली होती.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं भिवंडी कनेक्शन आहे तरी काय?
याच भेटीनंतर आता संध्याकाळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, मागील तासाभरापासून चर्चा ही सुरूच आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आता सर्वपक्षीय नेते हे गंभीर आरोप करत आहेत. यामुळे आता नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री फडणवीस हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाज आमदार सुरेश धस यांच्यासह विरोध पक्षातील आमदारांनी आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
'जोपर्यंत पुरावा नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही...' अजित पवारांची भूमिका सूत्रांची माहिती
दरम्यान, ‘जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत कारवाई नाही’, अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीत घेतली असल्याची माहिती आता समोर आली आहे. अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती देण्यात आली आहे.
न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई करायची नाही असा पवित्रा धनंजय मुंडेंनी घेतला आहे.
त्यामुळे तिन्ही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई केली जावी. असं अजित पवारांचं मत असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
