Exclusive: 'ठाकरेंनी प्लॅनिंग केलेलं.. पण मी काय त्यासाठी थांबलो असतो का?', CM शिंदेंची मुलाखत जशीच्या तशी

साहिल जोशी

ADVERTISEMENT

CM शिंदेंची मुलाखत जशीच्या तशी
CM शिंदेंची मुलाखत जशीच्या तशी
social share
google news

CM Eknath Shinde on Udddhav Thackeray: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडला. दरम्यान, याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. (lok sabha election 2024 exclusive interview uddhav thackeray did the planning but would i have waited for it cm eknath shinde interview as it is)

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह काही भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी केली होती. त्याच दबावाचा वापर करून ते भाजपचे 25 ते 30 आमदार फोडून स्वत:चं सरकार मजबूत करण्याचा प्रयत्न करणार होते. असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. 

दरम्यान, शिंदेंच्या या विधानानंतर मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी त्यांना असा प्रश्न विचारला की, 'तसं झालं असतं तर तुमचं बंड होऊ शकलं नसतं..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावर मुख्यमंत्री शिंदे फक्त एवढंच म्हणाले की, 'मी काय त्यासाठी थांबलो असतो का?'

या अशा वक्तव्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक गोष्टींवर महत्त्वाचं भाष्य केलंय. वाचा मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय-काय म्हणाले. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुलाखत जशीच्या तशी...

1. प्रश्न: या निवडणुका तुमच्यासाठी किती कठीण आहेत?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे: आम्ही कोणत्याही निवडणुका कठीण मानत नाही किंवा सोप्याही मानत नाही. निवडणुका या त्याच पद्धतीने लढवतो. निवडणुका आल्या म्हणजे काम करतो असं नाही.. निवडणुका असो अथवा नसो आमचं काम लोकांसाठी वर्षाचे 12 महिने सुरू असतं. निवडणुकीची भीती आणि चिंता आमच्याकडे नसते. आम्ही काम करतो. कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतो. या राज्यात दोन वर्षात केलेली कामं समोर आहेत. 

हे ही वाचा>> 'महाराष्ट्रात 'एवढ्या' जागा मिळतील', CM शिंदेंनी आकडाच सांगितला

2. प्रश्न: तुमच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वेळी लोकसभा निवडणुकाचा निकाल लागतोय. तुमचा दोन वर्षांचा अनुभव कसा होता?

एकनाथ शिंदे: दोन वर्षात खूप काम करायची संधी मिळाली. निर्णय घेण्याची संधी मिळाली, आम्ही टीम म्हणून काम केलं. देवेंद्रजी, नंतर अजितदादा आले. एक टीमवर्क होतं आमचं. ज्या योजना शेतकऱ्यांच्या असतील इतर ज्या काही असतील.. ज्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या होत्या. ज्या जनतेच्या हिताच्या होत्या त्या सुरू केल्या. अनेक प्रकल्प सुरू केले, उद्घाटनही केलं. 

जर सरकार बदललं नसतं तर हे प्रकल्प खितपत पडले असते. आम्ही नवीन प्रकल्पांना हात घातला आहे. वसई-विरार अलिबाग कॉरिडोर हा कोस्टल आम्ही विरारपर्यंत नेतोय. हा मुंबई-सिंधुदुर्ग हा आम्ही ग्रीन फिल्ड करतोय. मुंबई-सिंधुदुर्ग कोस्टलवर काम सुरू आहे. पूर्ण टूरिझम विकसित होईल, सगळे बीच विकसित होईल, तिथे कनेक्टिव्हिटी मिळेल. 

नागपूर ते गोवा आम्ही शक्तीपीठ करतोय.. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली. 

3. प्रश्न: शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही तसाच आहे.. शेतकऱ्यांनी आंदोलनं केली.. तीन दिवसांपूर्वी कांद्यावरची निर्यात बंदी उठवली.. निवडणुकीला घाबरून हा निर्णय घेतला असं अनेकांचं म्हणणं आहे. 

एकनाथ शिंदे: नाही.. नाही.. असं नाही.. शेवटी ग्राहक आणि शेतकरी या दोघांचाही विचार केंद्र सरकार करतं. त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांचा म्हणाल तर आतापर्यंत अवकाळी, अतिवृष्टी, गारपीठमध्ये आतापर्यंत कधीही नव्हे एवढे पैसे मोबदला म्हणून आम्ही शेतकऱ्यांना दिले.. 15 हजार कोटी... 

हे ही वाचा>> 'BJP हा फुटलेला पक्ष नाही मात्र शिवसेना..', CM शिंदेंचं मोठं विधान

NDRF चे नियम आम्ही डावलले आम्ही 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले.. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आम्ही गृहीत धरलं. 15 हजार कोटी देणारं हे पहिलं सरकार आहे. 35 हजार कोटींच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या. 

6 हजार मोदी साहेबांचे आणि 6 हजार आमचे त्यात टाकले.. 12 हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार, पीक विमा आम्ही केला. सगळे प्रीमियम आम्ही भरतोय. फक्त 1 रुपया आम्ही शेतकऱ्यांकडून घेतोय. शेतकऱ्यांना जोडधंदे आम्ही देतोय.. शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. 

सेंद्रीय शेतीला आम्ही प्रोत्साहन देतोय. सिंचनाचे 122 प्रकल्प आम्ही मंजूर केले. 15 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. किती मोठं काम शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे.. त्याला केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो. 

महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी योजना केल्या आहेत. सक्षमीकरण, लेक लाडकी.. युवक, रोजगारासाठी आम्ही काम करतोय. सगळं मोठं काम आम्हाला दोन वर्षात करायला मिळालं. 

4. प्रश्न: राहुल गांधी म्हणाले की आम्ही 73 टक्के आरक्षण देऊ.. मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला. तुम्ही आरक्षण देऊनही त्यांची कुणबी आरक्षणाची मागणी कायम आहे. दुसरीकडे उमदेवारांना या मुद्द्यावरून अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे तुम्ही कसं बघता?

एकनाथ शिंदे: मराठा समाजाला आरक्षण जेव्हा राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा देणं शक्य होतं. द्यायला पाहिजे होतं. पण दिलं नाही.. मराठा समाजाच्या नावावर राजकारण केलं. मोठे नेते झाले पण मराठा समाजाला वंचित ठेवलं. ही वस्तूस्थिती आहे.. पण जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं.. हायकोर्टात टिकवलं. दुर्दैवाने सरकार बदललं.. महाविकास आघाडी सरकार आलं. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवू शकले नाही. मग ओबीसी इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. 

मी जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मी सांगितलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आमचं सरकार देणार.. विशेष अधिवेशन घेतलं. त्यात 10 टक्क्यांचा निर्णय घेतला. ज्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं तेच म्हणाले की, आरक्षण टिकणार नाही. मी त्यांना आव्हान दिलं. टिकणार का नाही याची कारणं तुम्ही द्या.. आणि कसं टिकेल याची कारणं मी देतो. 

मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय त्याचा जो सर्व्हे करण्याता आला आहे तो व्यापक आहे. दोन लाख लोकं कामाला लावले होते. 

5. प्रश्न: तरीही बीडमध्ये या पद्धतीचा सामना का करावा लागला? 

एकनाथ शिंदे: सामाजिक आणि शैक्षणिक मागसलेपण सिद्ध झालं. कोर्टात काही लोकं गेले की, हे आरक्षण रद्द करा म्हणून.. पण कोर्टाने ते रद्द केलं नाही. कारण कोर्टाने ते डिटेल बघितलं. आतापर्यंतच्या इतिहासात अशाप्रकारचं सर्वेक्षण झालं नव्हतं. नेमका मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम हे आयोगाने केलं. त्यामुळे ते त्याला स्टे मिळालं नाही. आज मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळतं आहे. ते चालू आहे. 

आता कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्याचं काम अगोदरच्या सरकारने केलं होतं का? कायदा होता, नियम होता. पण आमच्या सरकारने.. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र कायदा असून मिळत नाही अशी तक्रार केल्यानंतर आम्ही न्यायमूर्ती शिंदे कमिटी स्थापन केलं. 

या कमिटी काम केलं, भरपूर काम केलं.. जिल्ह्याजिल्ह्यात वेगळे सेल तयार केले आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. हे आमच्या सरकारने सुरू केलं.

5. प्रश्न: मराठा समाजाच्या आरक्षणाला तुमच्या सरकारमधून जो विरोध झाला, भुजबळ असतील इतर नेते.. त्यामुळे मराठा समाजाचा अजूनही रोष बीड वैगरे इथे बघायला मिळतोय

एकनाथ शिंदे: हे समजून घेतलं पाहिजे की, विरोधी पक्षाचे लोक हे समाजाला ज्या पद्धतीने प्रवृत्त करतायेत किंवा त्यात संभ्रम पसरवतायेत. की, हे टिकणार नाही, हे कोर्ट रद्द करेल पण आम्ही खात्रीशीर सांगतो की, जे काम आम्ही केलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून केलं आहे. त्यामुळे ते 100 टक्के टिकेल आणि ते टिकविण्याची जबाबदारी सरकारची आहे.

6. प्रश्न: लोकसभा निवडणुकीत तुम्हाला 15 जागा मिळाल्या.. अनेकांना वाटलं नव्हतं की, एवढ्या जागा तुम्हाला मिळतील. जागा वाटप हे किती कठीण होतं?

एकनाथ शिंदे: कसं असतं.. तीन पक्ष आहेत.. कार्यकर्त्यांची भावना असते की, ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे.. शेवटी बघा यात काही समीकरणं असतात, गणितं असतात.. एकदा महायुतीने निर्णय घेतला की, सगळ्या कुजबूज आणि कुरबुरी बंद होतात. 

7. प्रश्न: तुमचे नेते म्हणतात की, भाजपला पूर्वी 25 जागा मिळायच्या पण आता त्यांनी 28 करून घेतल्या. पण शिवसेनेच्या जागा 20 वरून 15 झाल्या. 

एकनाथ शिंदे: माझे नेते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी सल्ला-मसलत करत असतो. चर्चा होत असते.. भाजप हा फुटलेला पक्ष नाही. भाजप एकसंध आहे. शिवसेना फुटलेली आहे. त्यामुळे साहजिक आहे.. काही जागा इकडे-तिकडे होतात. महायुती आहे.. मित्रपक्ष आहे. आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की, 15 जागा मिळाल्या आहेत त्यावर आमचे सगळे लोकं समाधानी आहेत. ज्या जागा मिळाल्या आहेत त्यावर आम्ही जिंकणार आहोत.

8. प्रश्न: कोकणात यंदा धनुष्यबाणच नाहीए.. 1990 पासून शिवसेना निवडणूक लढवते आहे. पण ही पहिली वेळ असेल की कोकणात धनुष्यबाणच नाही. 

एकनाथ शिंदे: असं बघायला गेलं तर कोकण हा ठाण्यापासून, मुंबईपासून कोकण धरला तर असं म्हणता येणार नाही.. काही गोष्टी या महायुतीत असतात.. देवाणघेवाण होत असते. त्यामुळे तसं काही विचार करण्याची गरज नाही. शेवटी आम्हाला महायुतीच्या जागा जास्तीत जास्त... 

9. प्रश्न: तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल ना.. कोकण हा कणा आहे शिवसेनेचा.. तिकडेच धनुष्यबाण नाही.. 

एकनाथ शिंदे: नारायण राणे साहेबपण आमचेच आहेत ना.. बाळासाहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे तो.. ठीकए चिन्ह बदललं तरी माणूस बदलत नाही. त्यामुळे महायुतीच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणणं हा आमचा उद्देश आहे.. 

महाविकास आघाडीत जसा गोंधळ आहे.. की, गळ्यात गळा आणि पायात पाय तसं आमच्याकडे नाही..  ठीकए जागा वाटप होईपर्यंत थोडसं होतं.. ते काय घरात पण होतं.. कुटुंबात पण चालतं. 

10. प्रश्न: चर्चा अशा होती की, 25 आमदारांना घेऊन सूरतला जाणं सोप्पं होतं पण ठाण्याची जागा भाजपकडून काढणं ते जास्त कठीण होतं.. 

एकनाथ शिंदे: मी शांत होतो.. मला माहीत होतं ठाण्याची जागा आपल्याला मिळेल. वरिष्ठ त्यावर योग्य विचार करतील. ठाण्याबद्दल एक वेगळं समीकरण आहे. इमोशन आहे.. आनंद दिघे साहेबांची तिथे एक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मी शांत होतो. बाहेर कोणाला काय वाटायचं काय पर्सेप्शन तयार करायचं त्याच्याशी... 

11. प्रश्न: तुम्हाला जागा वाटपात प्रत्येकासोबत संघर्ष करावा लागला. नाशिक, ठाणे, द. मुंबई.. यासारख्या काही जागांवर.. नाशिकची जागा तर अमित शाहांनी भुजबळांना द्यायला सांगितली होती. अमित शाहांनी सांगून सुद्धा नाशिकची जागा तुम्ही कशी मिळवली? 

एकनाथ शिंदे: संघर्ष तर असतोच.. विनासंघर्ष काय मजा आहे ओ? संघर्षातच मजा असते.. आयतं मिळालेल्यांमध्ये काही लोकं आहेतच.. त्यांना विचारा.. आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आल्या पाहिजेत त्या पण मारता येत नाही. त्यामुळे मी संघर्षाला कधी घाबरत नाही. 

माझ्या जीवनात संघर्ष हा लिहला आहे त्यामुळे संघर्षातून शिकत असतो. 

12. प्रश्न: जागा वाटपातून काय शिकलात?

एकनाथ शिंदे: जागा वाटपातून काय.. सगळं समन्वयातून झालं.. काही अडचण आली नाही. काही नाही.. भुजबळ साहेब स्वत: हेमंत गोडसेंचा अर्ज भरताना हजर होते. निर्णय झाल्यानंतर आता काय.. 

आता जिथे-जिथे आवश्यकता आहे तिथे-तिथे आम्ही तिघं जातो तिथल्या लोकांना सांगतो.. बोलावतो.. महायुतीची जागा आली पाहिजे हा एकच उद्देश आमचा आहे. मोदीजींना पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी ताकद त्यांच्या पाठिशी उभी करायची हा एकच उद्देश आमचा आहे. 

13. प्रश्न: मेघदूत आणि वर्षा बंगला हे मागील काही दिवस तक्रार निवारण केंद्र बनलं होतं. अनेक नाराजांची तुम्हाला समजूत काढावी लागली.. 

एकनाथ शिंदे: हे निवडणुकीत असं असतंच.. एका पक्षाचं असलं तरी इच्छुक खूप असतात. एका पेक्षा एक रथी-महारथी असतात. निवडून येणाऱ्या जागा जिथे असतात.. खात्री असते तिथेच स्पर्धा अधिक असते. 

समोर.. म्हणजे तिकडे येणारच नाही तिकडे काही स्पर्धाच नाही. इकडे स्पर्धा आहे.. जे युतीचं सरकार असतं त्यात मजा असते.  

14. प्रश्न: पंतप्रधान मोदी नुकतेच एका मुलाखतीत म्हणाले की, उद्धव ठाकरेंसोबत अजूनही त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. अजूनही गरज पडली तर ते मदत करतील. या विधानाकडे तुम्ही कसं पाहता?  

एकनाथ शिंदे: या विधानाकडे मी फक्त सहानुभूती आणि माणूसकी या दृष्टीने पाहतो. राजकीयदृष्ट्या त्याकडे पाहत नाही. कारण ते जेव्हा आजारी होते तेव्हाही मोदीजी त्यांना फोन करत होते आणि आताही म्हणाले की, वैयक्तिक अडचण असेल तेव्हा मदत करेन. हा मनाचा मोठेपणा आहे त्यांचा. पण हेच त्यांना भेटून आले आणि त्यांच्या 12 लोकांना अपात्र केलं. हा यांच्या मनाचा काय आहे तर.. खोटेपणा.. 

तिकडे मोठेपणा आणि इकडे खोटेपणा आहे. त्यामुळे हे तर त्यांचा पक्षच फोडायला निघाले होते महाविकास आघाडी असताना.. 

15. प्रश्न: कधीची गोष्ट आहे ही? आणि तुम्हाला कोणती जबाबदारी दिली होती त्याबाबत? 

एकनाथ शिंदे: महाविकास आघाडीचं सरकार असताना..  मी त्या सरकारमध्ये होतोच की.. मी ती असली जबाबदारी घेत नाही. कारण मला माहीत होतं सगळ्या गोष्टी आहेत.. त्या अशा प्रकारचं सरकार.. 12 लोकांना अपात्र केलं. त्यानंतर 2-5 लोकांना जेलमध्ये घालायचं प्लॅनिंग केलेलं. नंतर 25-30 आमदार फोडून महाविकास आघाडी मजबूत करायचं असं पूर्ण प्लॅनिंग होतं. त्याप्रमाणे काम सुरू झालं होतं. त्या लोकांना टॅप करणं, निधी देणं.. सगळं वातावरण तयार करणं चालू होतं. 

16. प्रश्न: पण ते झालं असतं तर तुमचं बंड होऊ शकलं नसतं.. 

एकनाथ शिंदे: मी काय त्यासाठी थांबलो असतो का? 

17. प्रश्न: या सगळ्यासाठी तुमची तयारी आधीपासून सुरू होती?

एकनाथ शिंदे: बिल्कूल नव्हती.. आम्ही त्यांना सांगितलं की पुन्हा युती करा.. आपण चुकीचं काम केलेलं आहे.. ते चुकले असतील, तुम्ही चुकले असेल. सगळं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपली विचारधारा सारखी आहे.. शिवसेना-भाजप नैसर्गिक युती असलेला पक्ष आहे लोकांना आपल्याला मतदान युती म्हणून केलं आहे. 

तुम्ही सरकार बनवलं, मुख्यमंत्री झालात.. आता जाऊ द्या. आम्ही म्हणालो की, आपण भाजपसोबत युती करू. ते म्हणाले की, आपण प्रयत्न करूया. पण ते प्रयत्न नव्हते तर टाइमपास होता. 

ते मोदीजींना पण भेटून आले त्यांनाही शब्द देऊन आले.. इकडे येऊन पलटी मारली.. 12 आमदारांना अपात्र केलं. त्यांना वाटलं आता काय आपण सरकारमधून हलत नाही. मग त्यांनी दुसरा प्लॅन.. जो मी आता सांगितला.. तो रचला.. 

18. प्रश्न: उद्धव ठाकरे म्हणतात की, मोदींनी आजारी असताना फोन केला होता, पण आजारी असताना त्याचवेळेस सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 

एकनाथ शिंदे: बिल्कूल नाही.. आम्ही त्यांना संधी दिली.. मी त्यांना अनेकवेळा म्हणालो तुम्ही भाजपसोबत युती करा. युती केली असती तर मी मुख्यमंत्री झालो असतो का? 

मला तो मोह देखील नव्हता. युती केली असती तर मी कसा मुख्यमंत्री झालो असतो? भाजपसोबत युती केली असती तर मी कसा झालो असतो? भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला असता. किंवा त्या पक्षाने निर्णय घेतला असता तर झालं असतं. 

परंतु माझा उद्देश एवढा होता की, शिवसेना-भाजप मित्र पक्ष आहेत.. ही युती बाळासाहेबांनी केलेली, अटलजी-प्रमोदजींनी केलेली आहे. मध्ये थोडासा बॅड पॅच आलाय.. आपण पुन्हा करूया युती.. 

पण यांना 5 वर्ष मुख्यमंत्री राहायचं होतं. टिकून राहायचं होतं. म्हणून यांनी सगळ्या केसेस वैगरे काढल्या. केसेस काढून काय करणार? देवेंद्रजीसकट आत घालण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भाजप घाबरेल, बॅकफूटवर जाईल आणि यांचे 25-30 आमदार बिथरतील.. त्यांना महाविकास आघाडीला जोडून घेऊ म्हणजे 5 वर्ष आपल्या मुख्यमंत्री पदाला काही टेन्शन नाही. 

19. प्रश्न: पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्हाला जे मुख्यमंत्री पद आहे ती बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली आहे.. 

एकनाथ शिंदे: खूप मोठी गोष्ट आहे..   

20. प्रश्न: प्रश्न असा आहे की, श्रद्धांजली ही एकदाच दिलेली आहे की, कायमची दिलेली आहे?

एकनाथ शिंदे: आता आमच्यासमोर काय.. बाळासाहेबांना शब्द देणारे, स्वप्न पूर्ण करणारे कोण? तर उद्धवजी.. काय म्हणाले.. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवणार.. 

अरे माझं सोडा.. दुसऱ्याला तर बसवायला पाहिजे होता. तुम्हीच बसले.. हे आम्हाला सांगितलं असतं तसा माहोल तयार केला असता. पण ते पोटात एक.. ओठात एक.. हे कळून देत नाही.. त्यांनी ते केलं.. 

बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते मोदींनी पूर्ण केलं.. मग मोठ्या मनाचा माणूस कोण? 

21. प्रश्न: उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीसांनी शब्द दिला होता की, मी आदित्य ठाकरेंना तयार करतो आणि मी दिल्लीत निघून जातो.. अशी काही चर्चा झाल्याचं तुम्हाला आठवतंय का? 

एकनाथ शिंदे: हा नवीन काही तरी जुमला आहे.. आधी म्हणाले अमितभाईंनी अडीच वर्षाचा शब्द दिला होता. अमितभाईंनी तर साफ नकार दिलाय.. यामध्ये असं काही नव्हतं. हा सत्तेत 50 टक्के वाटा ठीक आहे. मुख्यमंत्री पदामध्ये 50 टक्के देणार हे साफ झूट.. खोटं आहे.. 

ते म्हणाले, जर आम्ही शब्द दिला असता.. जर आम्ही इतर लोकांना देतो तर यांना का नाही देणार? 

22. प्रश्न: अजित पवार म्हणतात युती-आघाडीचं राजकारण हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे. तुम्हाला काय वाटतं? 

एकनाथ शिंदे: आता ओरिजनल शिवसेना ही भाजपसोबत आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना भाजपसोबत आहे. अजितदादांनी त्यात विकासाच्या मुद्द्यावर साथ दिली आहे. त्यामुळे उद्देश आमचा एक आहे. या राज्याचा विकास करणं.. जनतेच्या जीवनात बदल घडवणं.. त्यांना सुखी-समाधानी करणं हा जर उद्देश असेल तर मग अडचण काय आहे? 

जर आमचा अजेंडा एक आहे तर अडचण काय? आमची ही युती तर जुनी आहे ना.. 25 वर्षांची अजितदादा 25 वर्षांची अजितदादा त्याच्यात आले आहेत. अजितदादांवर झालेला इतक्या वर्षांचा अन्याय म्हणून ते आले. आणि विकासाला त्यांनी साथ दिलीए. उद्देश सारखा असेल, जनतेच्या हिताचा असेल तर काही आवश्यकता नाही.. 

23. प्रश्न: युतीमध्ये राहून तुम्ही तुमचा पक्ष कसा मोठा करणार? शिवसेना कशी वाढवणार?

एकनाथ शिंदे: बघा, आमचं आताचं टार्गेट काय आहे.. लोकसभा.. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून द्यायच्या.. मोदीजींचे हात बळकट करायचे.. मोदींचे जे स्वप्न आणि निर्धार आहे.. या देशात 400 पारचा आकडा पूर्ण करायचा हे आमचं टार्गेट आहे. बाकी विषय आमच्यासमोर आणि डोक्यात नाही.

24. प्रश्न: तुम्ही तिकीट वाटली त्यामुळे भाजपमध्ये असंतोष होता म्हणून तुम्हाला उमेदवार बदलावे लागले. 

एकनाथ शिंदे: भाजपचा यामध्ये काहीही रोल नाही.. माझा निर्णय आहे.. माझा निर्णय मी माझ्या खासदारांना सांगितला. त्यांनी अगदी तो ऐकला आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली. एक शिस्तीचं दर्शन घडवलं. त्यामुळे मी त्यांना आता थांबवलेलं आहे.. ते काही कामाचे नव्हते किंवा ते काही त्या लायक नव्हते असं नाहीए. आम्ही योग्य तो सन्मान करणार. 

त्यांचं पुनर्वसन करू.. काही अडचण नाही.. पक्ष मोठा आहे. सरकार आहे आपलं..

25. प्रश्न: रवींद्र वायकरांना तुम्ही तिकीट दिलं, त्यांच्यावर दोन महिन्यापूर्वी ईडीच्या रेड झाल्या. पण ते तुमच्या पक्षात आले आणि तुम्ही लगेच त्यांना तिकीट दिलं.. 

एकनाथ शिंदे: तो दोषी थोडाच आहे.. आरोप लावणं आणि आरोप सिद्ध होणं यात फरक आहे.. 

26. प्रश्न: दुसरीकडे खिचडी घोटाळ्याचे आरोप केले जात आहे. एकीकडे रवींद्र वायकर दुसरीकडे अमोल किर्तीकर.. दोघांवर ईडीचे आरोप आहेत. 

एकनाथ शिंदे: रवींद्र वायकर यांची आम्ही पूर्ण पार्श्वभूमी तपासली आहे. त्यामध्ये त्यांचं मातोश्री जे क्लब आहे त्यासंबंधी बाबी तपासल्या आहेत. मी सगळं तपासून घेतल्यानंतरच त्यांना तिकीट दिलं आहे. 

27. प्रश्न: तुम्हाला वाटत नाही का? त्यांच्यावर झालेले आरोप आणि यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप सारखेच आहेत.

एकनाथ शिंदे: नाही. नाही.. यांच्यावरचे आरोप तर सिद्ध आहेत ना.. त्यांनी पैसे घेतले आहेत खिचडीमधून.. डेड बॉडी बॅगमधून पैसे घेतले आहेत. चेकद्वारे.. कोव्हिडमध्ये 300 ग्रॅम खिचडी ही 100 ग्रॅम देणं हे किती पाप आहे. 

इकडे माणसं मरत होते आणि इकडे हे पैसे बनवत होते. यामागे कोण होतं, कोणाचे आदेश होते त्यासाठी? कोण कोणाला कंत्राट देत होतं? 

28. प्रश्न: म्हणजे उद्धव ठाकरेंवर कारवाई होईल? 

एकनाथ शिंदे: हा तपासाचा भाग आहे.. कोणी कोणाला काम दिलं.. कोणाच्या शिफारसीने कोव्हिड सेंटर उभं राहिलं. हे तपासात येईल.. त्यामुळे याबाबत मी आता कशाला सांगू.. तो तपास यंत्रणेचा भाग आहे. 

29. प्रश्न: ही निवडणूक तुमच्यासाठी जिंकू किंवा मरू असं आहे का? तुमचं पुढचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे का? 

एकनाथ शिंदे: असं काही नाही.. ही निवडणूक आमच्यासाठी चांगली आहे. आमच्या चांगल्या जागा येतील. संघर्षाशिवाय मजा पण नाही. आयतं मिळालं तर काय मजा?

लढून जिंकणं याला फार महत्त्व आहे. मी लढाऊ आहे.. त्यामुळे आयतं घरी बसून मिळावं अशी माझी कधी अपेक्षा नव्हती. ज्यांना आहे त्यांनी मिळवलं आणि घालवलं पण.. 

आज मी सांगतो खात्रीने.. महाराष्ट्रात महायुतीच्या जागा.. ज्या पद्धतीने बाहेर पर्सेप्शन चाललं आहे. अनपेक्षितपणे जागा महायुतीला मिळतील. आमचं 45 चं स्वप्न पूर्ण होईल आणि 15 पैकी 15 आमच्या (शिवसेनेच्या) जागा निवडून येतील. 

शंभर टक्के हरवणार.. कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर.. केलेली काम राज्याने आणि केंद्राने.. लोक त्याला पसंती देतील. घरी बसणाऱ्यांना थोडं लोकं पसंती देतात. माणसाला काम पाहिजे. माणसाच्या संकटात उभं राहिलं पाहिजे. 

प्रश्न: तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने तुमच्या 15 पैकी 15 जागा निवडून आल्या तर विधानसभेच्या वेळेस जागा वाटप करताना तुमची बाजू मजबूत होईल असं वाटतं? 

एकनाथ शिंदे: आता मी फक्त लोकसभेचं बोलतोय... माझा फोकस लोकसभेवर आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यावर माझा फोकस आहे. महाराष्ट्रातून 45 जागा देऊन मोदीजींचे हात बळकट करण्यावर माझा फोकस आहे.

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT