Maratha Reservation: “…तर आज आंदोलनाची वेळच आली नसती”, बावनकुळे ठाकरेंवर भडकले
Maratha Reservation Manoj jarange patil protest : देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs chandrashekhar Bawankule, Maratha Reservation News : राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेलं आंदोलन उग्र झालं आहे. जाळपोळीसह काही हिंसक घटना घडल्या आहेत. राज्यातील काही भागात अशांत वातावरण असताना देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी बाहेर राज्यात गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “देवेंद्रजींनी मराठा समाजाला कायदा करून दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर घालवले.”
हे ही वाचा >> Manoj Jarange पाटलांची CM शिंदेंकडे मोठी मागणी, अर्धा तास काय झाली चर्चा?
“उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचे आरक्षण घालवले नसते, तर आज आंदोलनाची वेळच आली नसती. आता तेच उद्धव ठाकरे देवेंद्रजींना मराठा आरक्षणावरून सवाल करत आहेत. याला म्हणतात xxच्या उलट्या बोंबा!”, अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
…ते आधी सांगा; बावनकुळेंचा सवाल
“बाप रुग्णालयात असताना पोरगा लंडनमध्ये काय करत होता ते उद्धव यांनी आधी सांगावे. मग देवेंद्रजींना विचारावे की, बाहेर प्रचारासाठी का गेलात?”,असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हे ही वाचा >> ‘मी विष पिऊन मरते, पण जरांगेंचा…’, मराठा आंदोलक महिलेने फोडला हंबरडा
“मुंबई बुडत असताना बाळासाहेबांना होडीत सोडून स्वतः फाईव स्टारमध्ये ते काय करत होते, ते उद्धव यांनी आधी सांगावे मगच देवेंद्रजींना प्रश्न विचारण्याचे धाडस करावे. उद्धवजी आणखी सांगू का? म्हणजे यादी वाढवता येईल…” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांबद्दल काय बोललेले?
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले होते की, “काल एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली, पण त्या मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय, असं कानावर आलं. आणि दुसरे उपमुख्यमंत्री मराठा, महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपचा प्रचार करायला रायपूरला गेले होते.”
“आपल्या राज्यात सगळं जळत असताना, लोक रस्त्यावर उतरलेली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातील प्रचार महत्त्वाचा वाटतो. अशी लोक या समाजाला न्याय देऊ शकतात का? हा प्रश्न ज्यांच्या त्यांच्या मनात आहे, तेच मी बोलत आहे”, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले होते.