Maharashtra Rain : राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आता हा पावसाचा जोर वाढणार की ओसरणार हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. अशात आज (28 सप्टेंबर 2024) तुमच्या शहरात हवामान विभागाचा अंदाज काय आहे जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहर-उपनगरात पावसाचा अंदाज काय?
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पण काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आहे.
राज्यातील 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा!
IMD च्या अंदाजानुसार, रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जळगावसह विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून, पावसाची उघडीप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT