Shrikant shinde Hemant Godse : कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीचे जागावाटप अजून ठरलेले नाही. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करून टाकली. नाशिकमधून गोडसे निवडणूक लढवणार, असे शिंदे म्हणाले अन् त्यानंतर भाजपमधून व्यक्त करण्यात आली. भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी तर दिल्लीतच उमेदवार ठरतील, असे म्हणत गोडसेंच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह लावले आहेत.
ADVERTISEMENT
नाशिक येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसेंच्या नावाची घोषणा केली. "पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने पाठवायचे आहे. गेली अनेक वर्ष हेमंत गोडसे हे या लोकसभा मतदारसंघासाठी काम करत आहेत", असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> भाजपच्या खासदारांची धडधड वाढली; पक्ष देणार झटका?
महायुतीचे जागावाटप अजूनही चर्चेच्या भोवऱ्यात अडकलेले असताना श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून हेमंत गोडसेंची घोषणा केली. यातून त्यांनी दोन गोष्टी साधल्या, एक म्हणजे शिवसेनेचे उमेदवार गोडसेच असतील आणि दुसरी म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेंनी उमेदवारी घोषित केल्यानंतर चिंतेत असलेल्या गोडसेंनी सुटकेच्या निश्वास टाकला. "गेल्यावेळी आमचे 18 खासदार धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे 18 जागा आम्हाला द्यावा, असा आमचा आग्रह आहे. 10 वर्षात मी केलेली कामे बघून मला उमेदवारी मिळाली आहे. कुणीही यामुळे नाराज होऊ नये", अशी भूमिका हेमंत गोडसे यांनी मांडली आहे.
भाजपमध्ये नाराजी...
नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार देऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी केलेल्या घोषणेने भाजपच्या इच्छुक उमेदवारांना धक्काच बसला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबद्दल नाराजीचा सूर लावला आहे.
भाजपच ठरवणार सर्वांची उमेदवारी
श्रीकांत शिंदेंनी घोषणा केली, पण भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाजपच सगळ्यांची उमेदवारी ठरवेल, असा स्पष्ट मेसेज दिला. 'श्रीकांत शिंदे हे अॅथॉरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल", असे दरेकरांनी म्हटले आहे.
हेही वाचा >> भाजपने एकाच दगडात मारले दोन पक्षी, लोकसभेत फायदा होणार का?
महायुतीतील तिन्ही पक्षांपैकी फक्त भाजपचेच नेतृत्व म्हणजे जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, अमित शाह हे दिल्लीत असतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व मुंबईत असते. त्यामुळे भाजपच महायुतीचे उमेदवार ठरवणार, असेच संकेत दरेकरांनी दिले आहेत. मात्र, शिंदेंनी जागावाटपाआधीच उमेदवाराची घोषणा केल्याने महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
ADVERTISEMENT
