KGF 2 : काय आहे ‘केजीएफ’चा इतिहास?; २००१ मध्ये केजीएफमधील काम का बंद करण्यात आलं?

मुंबई तक

• 07:05 AM • 03 Apr 2022

अभिनेता यश आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेल्या केजीएफ चॅप्टर २ काही दिवसांतच पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच प्रेक्षक दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत होते. दुसरा भाग काही दिवसांतच प्रदर्शित होत असून, ज्यावर हा चित्रपट आधारित आहे. त्या केजीएफचा इतिहासही असाच मन गुंतवून ठेवणारा आहे. कोलार गोल्ड फिल्ड्स याचंच संक्षिप्त […]

Mumbaitak
follow google news

अभिनेता यश आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेल्या केजीएफ चॅप्टर २ काही दिवसांतच पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच प्रेक्षक दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत होते. दुसरा भाग काही दिवसांतच प्रदर्शित होत असून, ज्यावर हा चित्रपट आधारित आहे. त्या केजीएफचा इतिहासही असाच मन गुंतवून ठेवणारा आहे.

हे वाचलं का?

कोलार गोल्ड फिल्ड्स याचंच संक्षिप्त रुप म्हणजे केजीएफ. हे ठिकाण आहे कर्नाटकातील दक्षिण-पूर्व भागात. आताच्या बंगळुरूच्या पूर्वेस बंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेसवे पासून शंभर किमी अंतरावर ही केजीएफ वसाहत आहे. कोलार गोल्ड फिल्ड्सवरूनच प्रत्येकाला या जागेच्या इतिहासाबद्दल जिज्ञासा निर्माण होते.

एका रिपोर्टनुसार १८७१ मध्ये ब्रिटिश सैनिक मायकल फिट्जगेरॉल्ड लेव्हेली यांनी १८०४ मध्ये एशियाटिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या चार पानी लेखात याबद्दल वाचलं होतं. त्या लेखात कोलारमध्ये आढळून येणाऱ्या सोन्याबद्दलची माहिती होती. हा लेख वाचल्यानंतर कोलारबद्दल लेव्हेली यांचा रस वाढला.

कोलारबद्दल माहिती मिळवत असतानाच लेव्हेली यांच्या हाती ब्रिटिश सरकारमध्ये लेफ्टनंट असलेल्या जॉन वॉरेन यांचा एक लेख लागला. लेव्हेली यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे १७९९ मध्ये श्रीरंगपट्टनमच्या लढाईत इंग्रजांनी टीपू सुलतान मारल्यानंतर कोलार आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर ताबा मिळवला.

काही कालावधी गेल्यानंतर इंग्रजांनी ही जमीन म्हैसूर राज्याला दिली, पण सर्व्हे करण्यासाठी ब्रिटिशांनी कोलारची जमीन स्वतःकडेच ठेवली होती. चोल साम्राज्याच्या काळात लोक हाताने जमीन खोदून सोनं काढायचे. त्यामुळे वॉरेन यांनी सोन्याची माहिती देणाऱ्यांना बक्षिसी देण्याची घोषणा केली.

वॉरेन यांनी घोषणा केल्यानंतर गावातील काही लोक त्यांच्याकडे आले. लोक ज्या बैलगाडीतून आले होते, बैलगाडीला कोलारची माती लागलेली होती. ही माती धुतल्यानंतर त्यात सोन्याचे अंश आढळून आले. त्यानंतर वॉरेन यांनी पुन्हा यांची पडताळणी सुरू केली.

कोलारचे लोक ज्या पद्धतीने हाताने जमीन खोदून सोनं काढतात, त्याच पद्धतीने ५६ किलो मातीतून मोजकंच सोनं मिळत होतं. त्यामुळे स्थानिक लोकांच्या कौशल्याचा वापर करून आणि तांत्रिक पद्धतीच्या मदतीने जास्त सोनं मिळवता येऊ शकतं असं वॉरेन म्हणाले.

वॉरेन यांच्या या अहवालानंतर १८०४ ते १८६० या काळात या भागात भरपूर संशोधन आणि पाहणी झाली, पण ब्रिटिशांच्या हाती काहीच पडलं नाही. उलट त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर तिथे होणाऱ्या खोदकामावरही प्रतिबंध घालण्यात आले.

वॉरेनचा अहवाल वाचल्यानंतर १८७१ मध्ये लेव्हेलीच्या मनात कोलारबद्दल एक उत्सुकता निर्माण झाली. लेव्हेलीने बैलगाडीतून प्रवास करत बंगळुरूहून कोलार गाठलं. तिथे तब्बल दोन वर्ष संशोधन केल्यानंतर १८७३ मध्ये लेव्हेलीला म्हैसूरच्या महाराजांनी खोदकाम करण्याची परवानगी दिली.

लेव्हलीने तब्बल २० वर्ष खोदकाम करण्याची परवानगी मिळवली आणि १८७५ मध्ये काम सुरू केलं. लेव्हेलीचा सुरुवातीचा काळ पैसे जमवण्यात आणि लोकांना या कामासाठी तयार करण्यातच गेला. त्यानंतर केजीएफमध्ये खोदकाम सुरू झालं.

केजीएफच्या खदाणीमध्ये उजेडासाठी मशाली आणि कंदिलांचा वापर केला जायचा. हे पुरेसं नसल्यानं विज वापरण्याचा निर्णय घेतला घेतला गेला. त्यामुळे केजीएफ भारतातील पहिलं पाणी-विज सुविधा असणारं शहर बनलं.

केजीएफ अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्सला पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा करण्यासाठी तिथून १३० किमी अंतरावर कावेरी वीज निर्मिती केंद्र तयार करण्यात आलं. जपाननंतर हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. वीज पुरवठा सुरू झाल्यानं केजीएफमधील सोनं उत्खनन वाढलं.

वेगाने खोदकाम करण्यासाठी मशिन्सचा वापर वाढवण्यात आला. त्यामुळे १९०२ पर्यंत केजीएफमधून भारतातील एकूण सोन्यापैकी ९५ टक्के सोनं येथून येऊ लागलं. त्यामुळे सोनं उत्सखननाच्या यादीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचला होता.

कोलार गोल्ड फिल्ड्समध्ये सोनं मिळायला लागलेल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचाही या जागेकडे ओढा वाढला. तेही इथे घरं बनवू लागले. ही जागा थंड असल्याने इथलं वातावरणही लोकांना आवडू लागलं. ब्रिटिश पद्धतीने घरं बांधली जाऊ लागली होती. डेक्कन हेरॉल्डच्या माहिती प्रमाणे त्यामुळे केजीएफला मिनी इंग्लंडही संबोधलं जाऊ लागलं होतं.

केजीएफला पाणीपुरवठा करण्यासाठी एक तलाव तयार करण्यात आला. तेथून पाईपलाईनने पाणी केजीएफपर्यंत आणलं गेलं. नंतरच्या काळात हाच तलाव केजीएफच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याचबरोबर सोन्यासाठी उत्खनन होत असल्याने आजूबाजूच्या राज्यातून लोक इथे कामासाठी येऊ लागले होते. १९३० नंतर या ठिकाणी ३० हजार मजूर काम करायचे.

भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर भारत सरकारने केजीएफ ताब्यात घेतलं. सरकारने १९५६ मध्ये केजीएफचं राष्ट्रीयीकरण केलं. १९७० मध्ये भारत सरकारच्या भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने इथे काम करणं सुरू केलं. सुरूवातीला फायदा झाला. मात्र नंतर नफा कमी होत गेला.

१९७९ नंतर अशी अवस्था आली की मजुरांचे पैसे देण्यासाठीही कंपनीकडे पैसे नव्हते. ८० च्या दशकात केजीएफची स्थिती खराब होत गेली. तेथून मिळणाऱ्या सोन्याच्या किंमती पेक्षा जास्त सोनं काढण्यासाठी खर्च होऊ लागला होता.

त्यानंतर २००१ मध्ये भारत गोल्ड माईन्सने येथील उत्खनन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही जागा तशीच पडून आहे. असं म्हटलं जात की आजही केजीएफमध्ये सोनं आहे. केजीएफमध्ये तब्बल १२१ वर्षांपेक्षा अधिक काळ उत्खनन सुरू होतं. २००१ पर्यंत तेथे उत्खनन सुरूच होतं.

    follow whatsapp