Shivdeep Lande: मराठमोळे IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा, महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री की...?

निलेश झालटे

20 Sep 2024 (अपडेटेड: 20 Sep 2024, 01:43 PM)

IPS Shivdeep Lande: बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता ते लवकरच राजकारणात एंट्री करणार आहेत.

मराठमोळे IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा

मराठमोळे IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा

follow google news

बातम्या हायलाइट

point

IPS शिवदीप लांडे यांनी दिला पदाचा राजीनामा

point

शिवदीप लांडे राजकारणात एंट्री करणार?

point

शिवसेना नेते विजय शिवतारेंचे जावई आहेत शिवदीप लांडे

IPS Shivdeep Lande Resigned: मुंबई: मराठमोळे IPS अधिकारी ज्यांची सिंघम अशी ओळख आहे त्या शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवदीप लांडेंसारख्या अधिकाऱ्याने अचानक राजीनामा देणं तसं नवं नाहीये. मात्र शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. तसं तर शिवदीप लांडे यांची ओळख करुन द्यायची गरज नाही, मात्र त्यांची एक खास ओळख म्हणजे ते शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई. (bihar cadre marathi ips officer shivdeep lande resigned entry in maharashtra politics or in bihar)

हे वाचलं का?

शिवदीप लांडे यांचं राजकीय कनेक्शन हे असं आधीपासूनच आहे. त्यामुळं अर्थातच लांडे आता राजकारणात एन्ट्री करणार हीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. लांडे खरंच राजकारणात एन्ट्री करणार? करणार तर कुठल्या पक्षात जाणार, महाराष्ट्रात विधानसभा लढवणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना केलेलं स्टेटमेंट बरंच काही सांगून जात आहे.

हे ही वाचा>> Shivdeep Lande : राजीनामा देण्याआधीच शिवदीप लांडे यांचं राजकीय क्षेत्रातील प्रवेशाचं ठरलं?

शिवदीप लांडेंनी नोकरी का सोडली, त्यांचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे, ते महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करणार की दुसरीकडे कुठे? याबाबतच जाणून घेऊयात सविस्तर. 

बिहार केडरचे IPS अधिकारी पूर्णिया रेंजचे आयजी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून ही माहिती दिली. राजीनामा देण्यामागचे कारण काय आहे हे त्यांनी अद्याप सांगितले नसले तरी भविष्यात ते बिहारमध्येच राहतील आणि बिहार हीच त्यांची कर्मभूमी राहील असे त्यांनी सांगितले आहे.

पाहा नेमकं काय म्हणाले शिवदीप लांडे...

लांडे यांनी फेसबुकवर लिहिलंय की, 'माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. इतक्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्याही वर ठेवले आहे. जर माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण भविष्यातही मी बिहारमध्येच राहणार आहे, बिहार माझी कर्मभूमी आहे.' 

शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.  29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं शिवदीप यांचा जन्म झालेला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट तरीही त्यावर मात करत त्यांनी एक मोठा पल्ला गाठला. शिवदीप यांना एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली.

हे ही वाचा>> Baramati : "पुरंदरचा मांडवली सम्राट"; विजय शिवतारेंवर सडकून टीका, पत्र व्हायरल

यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. नंतर त्यांनी यूपीएससीची तयारी केली. यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं होतं. 

शिवदीप यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. अनेकदा त्यांची बदली रद्द करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळालं आहे. त्यांच्या कामाचं कौतुक मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील अनेकदा केलंय. शिवदीप लांडे हे मध्यंतरी मुंबईत महाराष्ट्र पोलीस सेवेतही कार्यरत होते. त्यांनी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

लांडे यांनी राजीनामा देण्याचं नेमकं कारण सांगितलेलं नसलं, तरी मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार कर्मभूमी राहील या एका वक्तव्याने काहीशी दिशा मात्र स्पष्ट झाली आहे. याचा अर्थ उघड असा आहे की ते बिहारमध्ये राहतील. लांडे यांनी याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नसलं तरी रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षामध्ये सामील होतील असं बोललं जात आहे. 

2 ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर यांच्या पक्षाची मोठी घोषणा होणार आहे.  यामध्ये अनेक निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकारी सामील झाले आहेत. अलीकडेच माजी आयपीएस आनंद मिश्राही जनसुराजमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळं लांडे देखील जनसुराजमध्ये जातील अशी दाट शक्यता आहे. शिवाय ते पटना शहरातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून बिहारची 2025 मध्ये होणारी विधानसभा लढवतील असंही बोललं जात आहे.

लांडे यांनी असा निर्णय घेतला तर अर्थातच त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नसेल. कारण आधीही अनेक अधिकारी राजकारणात उतरले आहेत. मात्र जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी बिहार असा निर्णय घेतल्यानं लांडे विशेषपणे लक्षात राहतील हे नक्की...

 

    follow whatsapp