Virat Kohli, Rohit Sharma, Mohammed Siraj Cried : पुन्हा एकदा भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे होते. या स्पर्धेत भारतीय संघ सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, जेतेपदासाठीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा मोठा पराभव केला.
ADVERTISEMENT
अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मोहम्मद सिराजला हुंदका अनावर झाला. इतर खेळाडू सिराजला शांत करताना दिसले. मॅच संपल्यानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले होते. हुंदका आवरत तो मैदानाबाहेर गेला.
विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज असताना त्याच्या चेहऱ्यावर हे भाव प्रकट झाले. कारण भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. कोहलीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
भारतीय संघाने नाणेफेक गमावली अन्…
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सुरूवात चांगली केली पण, नंतर संघ डगमगताना दिसला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अवघ्या 240 धावा करू शकली.
दरम्यान, केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. दोघांनी डाव सावरला पण, धावगती वाढवण्यात ते अपयशी ठरले.
कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत झटपट 47 धावा केल्या. तर अखेरच्या षटकात फटकेबाजीची अपेक्षा असताना सूर्यकुमार यादव 28 चेंडूत केवळ 18 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि हेझलवूडने प्रत्येकी 2 मिळ घेतले.
ट्रॅव्हिस हेडने हिरावून घेतला विजय
241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 4 गडी गमावून सामना आणि विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची निर्णायक खेळी केली. तर मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
हे ही वाचा >> Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं
भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने 2, तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 बळी घेतला. त्यामुळे रोहित शर्माला कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करता आली नाही. कपिल देव यांनी 1983 मध्ये आणि धोनीने 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदाचा षटकार मारला.
ADVERTISEMENT
