‘तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर…’, प्रकाश आंबेडकरांनी साधला निशाणा
प्रकाश आंबडेकर यांनी आजच्या संविधान सन्मान महासभेच्या रॅलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवर टीका करत त्यांनी आजच्या आरक्षणाच्या मुद्यावरून चाललेल्या राजकारणावरही सडेतोड टीका केली.
ADVERTISEMENT

Prakash Ambedkar : ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) माझ्या नादी लागू नये, कारण त्याआधीपासून मी ओबीसी नेत्यांना मी ओळखतो. आजच्या काळात सुरु झालेल्या आरक्षणाच्या मुद्यावरुन जर इतिहास पाहिला गेला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होता असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवर सडेतोड टीका करत भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात संविधान सन्मान महासभेचं आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.
ओबीसी आरक्षण मिळवणारे आम्हीच
आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांवर जोरदार टीका केली. आजच्या काळात चाललेल्या आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी अनेक मुद्यांना हात घालत ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन चाललेल्या वादावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ओबीसींचे आरक्षण मिळवणारेही आम्हीच होतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> Crime : मुलगा होता बेपत्ता, कुटुंब शोधत शेतात पोहोचलं अन् मातीचा ढीग… पोलिसांना फुटला घाम
आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व
आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, आपला विकास करुन घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकमेव मार्ग आहे असा समज निर्माण झाला आहे. मात्र आरक्षण हा काही विकास नाही, तर आरक्षण हे प्रतिनिधित्व असल्याचे त्यांनी सांगितले.राजे-महाराजांच्या काळात ज्यांना क्षुद्र, दलित समजले जात होते, त्या ओबीसी, दलितांना दरबारामध्ये चोपदार होण्याचाही अधिकार त्यांना मिळाला नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या काळात तो कोणाला मिळाला नाही. हे राजे महाराजांच्या काळात होते त्यामुळेच त्यांना प्रशासनाशीही त्यांचा कधी संबंध आला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
…म्हणून आरक्षण चालू
प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाचे महत्व विशद करताना म्हणाले की, उद्याच्या लोकशाहीत, स्वतंत्र देशामध्ये दलित, ओबीसी ही लोकं व्यवस्थेबाहेर राहू नये त्यासाठी त्यांचा प्रतिनिधी राहण्यासाठी हे आरक्षण चालू करण्यात आल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.