”नातवाने शेण खाल्ले तरी…”, संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं
नातवाने शेण खाल्ले असले तरी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान आदर्शवत आहे, ते विसरता येणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांना डिवचलं आहे. यासोबत राऊत यांनी शिंदे गटावरही सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) आज पाटण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्यावर टीका केली आहे. नातवाने शेण खाल्ले असले तरी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान आदर्शवत आहे, ते विसरता येणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांना डिवचलं आहे. यासोबत राऊत यांनी शिंदे गटावरही सडकून टीका केली आहे. (sanjay raut criticize shambhuraj desai cm eknath shinde satara patan maharashtra politics)
रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टीका देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटावर केली आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपचे भाडोत्री सैन्य राज्य कारभार करत आहेत. भाडोत्री हे कोणाचेच नसतात आणि ते बाजारभुंनगे आहेत अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला.
हे ही वाचा : “बालबुद्धी, मंदबुद्धी”! शिवसेनेने आदित्य ठाकरेंना डिवचलं, पावसकर काय म्हणाले
बाळासाहेब देसाईंच्या स्मारकावर काय म्हणाले?
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवाने शेण खाल्ले असले तरी त्यांचे कार्य आजही आदर्शवत असून मुंबईत गेल्यावर आम्ही त्यांच्या कार्याची उदाहरणे देतो, असे संजय राऊत म्हणाले आहेत. मराठी माणसासाठी काँग्रेस पक्षात असूनही लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सकारात्मक भूमिका घेतली होती. महाराष्ट्र उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून संघर्ष व्हायला नको. त्यांचा सन्मान राखला जावा आणि चर्चेतून मार्ग काढला जावा असे मतही संजय राऊत यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या साताऱ्यातील नियोजित स्मारकाबाबत व्यक्त केले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी झाले होते. या दोन्ही उमेदवारांनी गद्दारी केली असली तरी या दोन्ही मतदारसंघात आमच्या पक्षाचे नाव उमेदवार विजयी झाले होते. या दोन्ही जागांवर आमचाच दावा असून या जागा आम्हीच लढवणार आहोत, असा विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकीत विरोधकांची सत्ता उलटवून टाकण्यासाठी जे – जे करावे लागेल, ते सर्व करणार आहोत.यासोबत महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जागा वाटपासाठी एकत्र येणार असून काही जागांची अदलाबदल होऊ शकते. मात्र ज्या जागेवर ज्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत, त्याच जागा लढवण्याबाबत आग्रही असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.