Shiv Sena UBT : “शिंदे गटात सरळ दोन गट पडलेत, उद्याच्या बेदिलीची ठिणगी…”

मुंबई तक

10 Apr 2023 (अपडेटेड: 10 Apr 2023, 02:43 AM)

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

Thackeray group has targeted Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Fadnavis in Saamana Editorial

Thackeray group has targeted Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Fadnavis in Saamana Editorial

follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार, आमदार, इतर नेते अयोध्येचा दौरा करून आले. शिवसेनेच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचेही अनेक नेते सहभागी झाले होते. या दौऱ्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून भाष्य करताना शिंदे आणि फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “डॉ. मिंधे व त्यांचे चाळीस लोक हे आधी सुरत व नंतर रेडय़ांची पूजाविधी करण्यासाठी गुवाहाटीस गेले. सत्ता स्थापन झाल्यावरही ते लोक अघोरी रेडा विधीसाठी पुन्हा गुवाहाटीस गेले, पण गुवाहाटीऐवजी श्रीरामांच्या अयोध्येत जावे असे या ‘भक्तां’ना वाटले नाही, हे आश्चर्यच आहे.”

एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री, नेते अयोध्येला गेले. असं असलं, तरी शिवसेनेचे काही मंत्री आणि पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत. त्यांच्या सहभागी न होण्याबद्दल ठाकरे गटाने सामनातून मोठं विधान केलं आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, “श्रीरामांपासून सत्य दडवता येणार नाही व राम असत्याला आशीर्वाद देणार नाहीत याची खात्री असल्यानेच हे लोक अयोध्येऐवजी गुवाहाटीस गेले. आता मिंधे सरकारातील काही मंत्री आणि आमदार अयोध्येत गेले, पण बरेच आमदार अयोध्या यात्रेत सामील झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. श्रीरामांच्या दर्शनास जाऊ नये असे त्यांना का वाटले, हे रहस्य आहे. मिंधे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे.”

शिंदेंच्या स्वागतावरून भाजपवर टीकास्त्र

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी भाजपचे मंत्री आणि नेते हजर होते. त्यांचं जल्लोषात स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. यावर भूमिका मांडतांना ठाकरे गटाने म्हटलं आहे की, “अयोध्येत उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळच ठरवेल. ‘गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा’ या उक्तीप्रमाणे भाजपही अयोध्या यात्रेत सामील झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी म्हणे यात्रेची चोख व्यवस्था केली. बेइमानांसाठी पायघड्या घालणे ही तर भाजपची संस्कृतीच आहे व त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.”

हेही वाचा >> राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंग यांनी शिंदे-फडणवीसांचं ‘असं’ केलं स्वागत…

राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीवरून ठाकरे गटाने सरकारवर टीका केली असून, “महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे व शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तिकडे संपूर्ण सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले. हे काही रामराज्याचे चित्र नाही. अनेक भागांत घरादारांचे नुकसान झाले. या नुकसानीवर उपाय शोधण्याऐवजी सरकार महाराष्ट्रातून गायब झाले व अयोध्येत यात्रा-उत्सवांत अडकून पडले. श्रीरामांच्या कार्यपद्धतीशी हे सुसंगत नाही”, अशा शब्दात सरकारला सुनावलं आहे.

तोंडात राम, बगलेत खंजीर; ठाकरे गटाचा हल्ला

“श्रीराम हे दयाळू, प्रजादक्ष राजे होते. ते प्रजेचे पालनहार होते. आज जे अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करीत आहेत, त्यांच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर आहे. श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे पाप धुतले जाईल की नाही ते माहीत नाही, पण त्यांना सुबुद्धी मिळो व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर होणारे रावणी हल्ले परतवून लावण्याचे बळ मिळो! अर्थात गुडघे टेकणाऱ्या मिंध्यांकडून ही अपेक्षा करणे चूकच आहे. चोरलेल्या धनुष्याने शौर्य गाजवता येत नाही!”, अशा शब्दात ठाकरे गटाने शिवसेनेवर टीकास्त्र डांगलं आहे.

    follow whatsapp