Manoj Jarange : ‘…मग अजितदादा अन् देवेंद्र फडणवीसांना कुठं पाठवतो?’, जरांगेंचा भुजबळांना सवाल
Manoj Jarange Latest News : छगन भुजबळांबद्दल मनोज जरांगे पाटलांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. भुजबळांच्या राजकीय महत्त्वकांक्षेबद्दल बोलताना जरांगे पाटलांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं काय करायचं, असा सवालही केला.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून, त्यांच्या या मागणीच्या विरोधात छगन भुजबळांना कडाडून विरोध केला आहे. भुजबळांनी अंबडच्या सभेतून मनोज जरांगेंवर हल्ला चढवला. त्याला जरांगेंनी कोल्हापुरातून उत्तर दिलं. यावेळी जरांगे पाटलांनी भुजबळांच्या राजकीय महत्त्वकांक्षेबद्दल मोठा दावा केला.
कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेतून मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट जरांगेंनी केला.
भुजबळांबद्दल जरांगे काय काय बोलले?
जरांगे म्हणाले, “त्यांचं दुसरं पण म्हणणं आहे. ते तर वेगळंच स्वप्न बघायला लागलेत असं कळालं मला. मला फक्त कळालंय की ते म्हणताहेत की मला (छगन भुजबळ) मुख्यमंत्री व्हायचं. आणि मग अजितदादांना कुठं पाठवतो? अन् देवेंद्र फडणवीस साहेबांचं? सगळ्यांना सोडून तुम्हालाच व्हायचं का? मग आमचा विषयच संपला. मग आम्हाला आरक्षणच नाही. तुमचं पोटातलं कसं ओठावर आलं”, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केलं.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal मनोज जरांगेवर तुटून पडले, 10 जहरी वार
यावेळी जरांगेंनी भुजबळांना तुरुंगात जाल, असाही इशारा दिला. ते म्हणाले, “जाल परत मधी, ते लय अवघड आहे. ते केव्हा मध्ये (तुरुंगात) टाकतील तुम्हाला मेळ पण नाही लागणार.”
“आम्ही कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्यात. सगळ्यांना कळलंय की मराठा ओबीसीमध्ये जाणार. नोंदी सापडल्यात मग मराठा ओबीसीत येणार की नाही? पण, हा माणूस म्हणतो आमच्यात येऊ नका. मग कुठे जायचं? तू एकटा कधीपर्यंत खातो? पुरावे सापडले म्हणजे मराठा ओबीसी आरक्षणात जातो”, असा पुनरुच्चार जरांगेंनी कोल्हापुरातील सभेत केला.
“भुजबळांना दंगली घडवून आणायच्यात”
“एक मंत्री जो घटनात्मक पदावर बसलाय, तो व्यक्ती कुणाचाच नसतो. तो जनतेचा असतो. त्या व्यक्तीने सर्रास सांगावं की यांचे बोर्ड फाडून टाका, याचा अर्थ होतो की, सामाजिक दंगली त्यांना घडवून आणायच्या आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगतो की, त्यांना आवरा, नसता ती तुमची भूमिका आहे का तेही स्पष्ट करा”, असं म्हणत जरांगेंनी शिंदे सरकारलाही लक्ष्य केलं.
हे ही वाचा >> आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?
“आमचे बोर्ड आहेत. बोर्ड तुमचेही लागणार आहेत. आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या. आम्हाला या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. मी राजर्षि शाहू महाराजांच्या पवित्र भूमितून सांगतोय की आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचं नाही. यापुढेही आम्हाला शांततेत आंदोलन करायचं आहे. माझा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शब्द आहे. सरकारने त्यांचं बोलायचं बंद करावं, नसता आमचा नाईलाज होईल. आम्ही साधा बांध फोडला तरी दोन-दोन पिढ्या एकमेकांना बोलत नाही. मग आमचं आरक्षण खाणाऱ्यांचं आम्ही काय करणार?”, असं म्हणत भुजबळांना जरांगेंनी आव्हान दिलं.