Jaykumar Gore Case : ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या अटकेला दुजोरा दिला. या महिलेला सातारा येथून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
3 कोटींची मागणी, 1 कोटी घेताना महिला पकडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला जयकुमार गोरे यांच्याकडून 3 कोटी रुपयांची मागणी करत होती. मागणी पूर्ण केली तर आरोप करायचे थांबवेल असं महिलेनं सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला एक कोटी रुपये घेताना रंगेहात पकडले. सध्या महिलेची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मात्र या महिलेची ओळख उघड केलेली नाही.
हे ही वाचा >> इंडिया टुडे GDB सर्व्हे: महाराष्ट्र सेफ की अनसेफ, सार्वजनिक सुरक्षेत कितवा क्रमांक.. कोण आहे अव्वल स्थानी?
जयकुमार हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते यापूर्वीही वादात सापडले आहेत. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354 (विनयभंग) अंतर्गत 2017 मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच, 2019 मध्ये, न्यायालयाने त्यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाशी संबंधित सर्व जप्त केलेले साहित्य नष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
महिलेनं जयकुमार गोरेंवर काय आरोप केले होते?
पीडित महिलेनं सांगितलं की, 27 नोव्हेंबर 2016 मी FIR दाखल केला. तेव्हाही त्यांनी मला बदनाम करण्याचे कटकारस्थान केले. 2019 ला त्याने निवडून आल्यावर त्रास होत होता म्हणून, कोर्टाच्या चेंबरमध्ये मला दंडवत घातला आणि माफी मागितली. मला वाटलं आता हा सुधारला असून, आपल्याला त्रास देणार नाही. त्यामुळे मी केस मागे घेतली म्हणून तो सुटला. त्याला कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही असं पीडित महिलेनं म्हटलं आहे. मी हे प्रकरण दाखल झाल्यापासून कधीच माध्यमांसमोर आले नाही. पण 25 जानेवारीला एक पत्र आलं, नंतर माझ्या नावाची एक FIR व्हायरल झाली. त्याचे कार्यकर्ते माझ्याबद्दल चर्चा करतात की, आम्ही दुबईला गेलो, याने मला पुण्यात फ्लॅट दिला, मुंबईत फ्लॅट दिला. त्यामुळे मी आता स्वत: उपोषणाला बसण्याचं ठरवलं, कारण हा माणूस कधीपर्यंत माझी अशी बदनामी करणार? असं पीडित महिलेनं टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
मंत्रिपदाच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी, गोरे यांचा पलटवार
याप्रकरणी विरोधी पक्षांनी गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विशेषत: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. मात्र, मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले.
हे ही वाचा >> "तुमच्यासारखे असे 56 पायाला बांधून फिरते" विधानपरिषदेत कडाडणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण?
जुनी आणि बंद प्रकरणं पुन्हा उकरून काढून विरोधक आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गोरे यांनी संजय राऊत आणि रोहित पवार यांच्याविरोधात विधानसभेत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
पत्रकार तुषार खरात यांच्यावरही खंडणीचा आरोप
एका स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार तुषार खरात यांनाही पोलिसांनी अटक केल्यानं या प्रकरणात आणखी एक रंजक ट्विस्ट आला. 'लय भारी' नावाच्या यूट्यूब चॅनलचे संपादक खरात यांच्यावर जयकुमार गोरे यांच्या सहकाऱ्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता. याशिवाय मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून 5 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीही पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
