Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. मात्र, या सर्व प्रकरणानंतर सांगलीतील संतोष जगदाळेंचे नातेवाईकही चांगलेच हादरले. दोन लोकांचं सारखंच नाव असल्यामुळे नातेवाईक त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी वारंवार फोन करत आहेत. विशेष म्हणजे सांगलीतील हे संतोष जगदाळे सुद्धा याच हल्ल्यातून थोडक्यात बचावले. घोडेस्वारीसाठी घोडे मिळाले नाहीत म्हणून सांगलीचे संतोष जगदाळे या हल्ल्यातून बचावले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> "अपघातातून वाचल्यावर म्हणाले होते दुसरा जन्म मिळाला, दहशतवाद्यांनी तो सुद्धा हिरावून घेतला"
संतोष जगदाळे यांनी त्यांचा अनुभव सांगितला. “काश्मीर दौऱ्यादरम्यान, आमच्या ग्रूपने पहलगाममध्ये रात्रीचा मुक्काम केला. आम्ही सकाळी फिरायला गेलो होतो, पण आम्हाला वर जाण्यासाठी घोडे सापडले नाहीत. म्हणून आम्ही सन टॉप पॉइंट पाहण्यासाठी गेलो. तिथून परत आल्यानंतर आम्हाला या हल्ल्याची माहिती मिळाली. सगळीकडे धावपळ आणि लष्कराचे जवान तैनात दिसले. त्यांनी आमची चौकशी केली आणि आम्हाला सुखरूप बाहेर काढलं. दरम्यान, गोळीबारात संतोष जगदाळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आली. टीव्हीवरही तीच बातमी चालू होती. माझे कुटुंब आणि नातेवाईक घाबरले आणि त्यांनी एकच मला फोन करायला सुरूवात केली. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मला सगळ्यांनी वारंवार फोन करायला सुरुवात केली.
हे ही वाचा >> "आणखी 15 मिनिट थांबलो असतो तर...", नांदेंडचं जोडपं काश्मीरमधून काय म्हणालं?
संतोष पुढे म्हणाले, "मला आधी हे काहीच कळलं नव्हतं. नंतर कळलं की पुण्यातील संतोष जगदाळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना हे समजावून सांगितलं, त्यानंतरच त्यांना दिलासा मिळाला." पर्यटक संतोष जगदाळे म्हणाले, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमुळे आम्हालाही शोक झाला आहे. जे घडलं ते खूप चुकीचं होतं. हे कोणासोबतही घडू नये.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली होती. यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते. यातील बहुतेक पर्यटक होते.
ADVERTISEMENT
