पुणे: पुण्यातील येथील जावेद खान यांनी पवित्र रमाजन महिना सुरू असताना एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या घटनेमुळे जावेद खान यांचे सर्वत्र कौतुक होत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या या कृतीबद्दल प्रचंड कौतुक केलं आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी जावेद खान यांना फोन करून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पुण्यातील सुधीर किंकळे या 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा काल (28 मार्च) अचानक मृत्यू झाला. पण यावेळी सुधीर किंकळे यांच्या बहीण जयश्री किंकळे यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार कसे करावे असा प्रश्न जयश्री यांना पडला. त्याचवेळी याबाबतची माहिती मायकल साठे यांनी जावेद खान या आपल्या मित्राला दिली.
ज्यानंतर जावेद खान यांनी तात्काळ ससून रुग्णालयात जाऊन स्वतः सुधीर किंकळे यांच्या अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडली. सुधीर किंकळे हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर सूर्यास्ताआधी अंत्यसंस्कार व्हावेत असं त्यांच्या बहिणीने जावेद खान यांना सांगितलं होतं. त्यावेळी जावेद खान यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या काही मित्रांच्या मदतीने हिंदू रीतिरिवाजानुसार सुधीर किंकळे यांच्यावरीलअत्यंसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.
हे ही वाचा>> Pune : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना
जावदे खान यांनी केलेल्या या कृतीने धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांचे अडथळे तोडून एकतेचा संदेश दिला आहे.
जावेद खान यांनी सांगितले की, "महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, आणि इथे सर्वधर्मसमभाव हा आपला धर्म आहे. मला या कुटुंबाची अडचण दिसली, आणि माझ्या मनात कोणताही भेदभाव आला नाही. मी फक्त माणुसकीच्या नात्याने हे कर्तव्य पार पाडले." त्यांच्या या कृतीने स्थानिक समाजात त्यांचे कौतुक झाले, आणि ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली.
उद्धव ठाकरे स्वत: केला फोन, जावेद खान यांच्याशी काय बोलले?
दरम्यान, या घटनेची माहिती जेव्हा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी तात्काळ जावेद खान स्वत:हून फोन केला आणि त्यांच्या कृतीचे मनापासून कौतुक केले.
हे ही वाचा>> Pune Crime : जन्मदात्या बापानं 3 वर्षाच्या मुलाला गळा चिरुन संपवलं, पत्नीच्या चरित्र्यावर...
पाहा उद्धव ठाकरे फोनवर काय म्हणाले:
उद्धव ठाकरे: हॅलो.. जय महाराष्ट्र जावेद जी..
जावेद: जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र साहेब
उद्धव ठाकरे: तुम्ही चांगलं काम केलं, याचा वृत्तांत आला माझ्याकडे.. तुम्हाला खास धन्यवाद, आणि तुम्हाला खूप लंबी उम्र मिले...
जावेद: थँक्यू साहेब, तुमचा फोन येणं म्हणजे साहेब.. ते काम सार्थक लागलं साहेब..
उद्धव ठाकरे: नाही नाही.. नक्की, नक्की.. खूप चांगलं वाटलं मला
जावेद: थँक्यू साहेब
उद्धव ठाकरे: जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे यांनी जावेद खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या घटनेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही जावेद खान यांचे कौतुक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामध्ये "हा आहे महाराष्ट्र धर्म!" असे नमूद करण्यात आले.
जावेद खान यांच्या या कृतीने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे. आजच्या काळात, जिथे धार्मिक आणि सांस्कृतिक भेदभावामुळे अनेकदा तणाव निर्माण होतो, तिथे जावेद खान यांनी एकतेचे आणि माणुसकीचे उदाहरण घालून दिले. स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या या कार्याचे स्वागत केले आहे. पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले, "जावेद खान यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने माणुसकीचा अर्थ समजावून दिला. आम्ही सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी."
जावेद खान यांच्याबद्दल
जावेद खान हे पुणे येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असून, सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी अनेकदा गरजूंना मदत केली आहे, आणि त्यांच्या या कृतीमुळे त्यांची ओळख एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष कार्यकर्ता म्हणून झाली आहे.
जावेद खान यांनी एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे एक सुंदर उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या कृतीने समाजात सकारात्मक संदेश पसरवला असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्याला मान्यता दिली आहे. अशा घटनांमुळे समाजातील माणुसकी आणि एकता अधिक दृढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
